पौराेहित्य करणाऱ्या वर्गावर कोरोनाची वक्रदृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:30 AM2021-05-07T04:30:59+5:302021-05-07T04:30:59+5:30
हिंगोली: कोरोना महामारीचा फटका शेती, व्यवसाय, व्यापार, उद्योगधंदे, शाळा, महाविद्यालयांना तर बसलाच आहे. त्याचबरोबर धार्मिक विधी करणाऱ्या पुरोहितांना बसल्याने ...
हिंगोली: कोरोना महामारीचा फटका शेती, व्यवसाय, व्यापार, उद्योगधंदे, शाळा, महाविद्यालयांना तर बसलाच आहे. त्याचबरोबर धार्मिक विधी करणाऱ्या पुरोहितांना बसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
कोणताही धार्मिक विधी पार पाडायचा झाल्यास पुरोहितांची गरज भासते. पण, गत १५ महिन्यांपासून कोरोनाने धार्मिक विधीवरच वक्रदृष्टी टाकली आहे. कोरोना संसर्गाचा धोका ओळखून शासनाने सर्वच सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. त्यामुळे पौराेहित्य करणाऱ्या वर्गावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
२३ मार्च २०२० पासून कोरोनाचे संकट सर्वत्र घोंगावत आहे. त्यामुळे साखरपुडा, मंदिरातील धार्मिक कार्यक्रम, दशक्रिया विधी, सत्यनारायण पूजा, उपनयन संस्कार आदी धार्मिक कार्यक्रम सार्वजनिकरित्या करायचे नाहीत, असे शासनाने सांगितले आहे. त्यामुळे पुरोहितांची उपासमार होऊ लागली आहे. पुरोहितांमध्ये काही कुटुंब अशी आहेत, की ज्यांचा उदरनिर्वाह धार्मिक विधीवरच अवलंबून आहे. परंतु हा धार्मिक विधी बंद असल्याने त्यांची चांगलीच ओढाताण होत आहे.
प्रतिक्रिया
जून महिन्यातील मुहूर्ताकडे लक्ष
एप्रिल महिन्यात ८ मुहूर्त होते, तेही असेच गेले. सध्या मे महिन्यात १६ मुहूर्त आहेत. पण, संचारबंदीमुळे कार्यक्रम करता येत नाहीत. यानंतर जून महिन्यात ८ मुहूर्त आहेत. जून महिना तरी हातून जाऊ नये म्हणून पुरोहितांनी चक्क देवाला साकडे घातले आहे. याचबरोबर शासनाने आमचा विचार करावा.
- संतोषगुरू अगस्ती, हिंगोली
शासनाने आर्थिक मदत करावी
कोरोना महामारीमुळे दीड वर्षापासून उपासमार होत आहे. धार्मिक कार्यक्रमांना शासनाने सूट दिल्यास कुटुंबाचा गाडा चालू शकतो. सर्व बाबींचा विचार करुन शासनाने पुरोहितांना सर्वतोपरी आर्थिक मदत करावी.
- सोहनगुरू महाराज पुरोहित, सेनगाव