ग्रामीण भागात कोरोना सुसाट; ना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ना आयसोलेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:28 IST2021-04-15T04:28:32+5:302021-04-15T04:28:32+5:30
हिंगोली : सध्या शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातच कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. एक तर रुग्ण स्वत:च तपासणीस टाळाटाळ ...

ग्रामीण भागात कोरोना सुसाट; ना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ना आयसोलेशन
हिंगोली : सध्या शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातच कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. एक तर रुग्ण स्वत:च तपासणीस टाळाटाळ करीत असून, रुग्ण आढळला तरीही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे, त्यांचे विलगीकरण करणे या बाबींना अपुऱ्या मनुष्यबळामुळे फाटाच दिला जात असल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपासून रोज सरासरी दोनशे ते अडीचशे रुग्ण आढळत आहेत. यातील साठ टक्के रुग्ण हे ग्रामीण भागातीलच असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी ८० टक्के शहरी, तर उर्वरित ग्रामीणचे दिसायचे. आता हे पालटलेले चित्र आरोग्य विभागाला त्रासदायक ठरत आहे. शहरी भागात कोरोनाबद्दल सजगता आहे. लोक स्वत:हून तपासण्या करतात. रुग्ण आढळल्यास निदान कुटुंबियांची तरी चाचणी होते. शिवाय नजीकच्या संपर्कातील लोकांना वेगळे राहण्यास सांगितले जाते. अथवा चाचणी करून घेतात. ग्रामीण भागात हे काहीच होत नाही. त्यातच रुग्ण आढळला तर त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तर अजून अवघड. शिवाय यासाठी आरोग्याकडे वेगळे मनुष्यबळही नाही. उपचार करण्यासाठीच मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे या ट्रेसिंगचे काम रामभरोसे आहे. ज्या रुग्णांचे नातेवाईक सजग आहेत, ते थोडेबहुत पथ्य पाळत आहेत. इतरांना कोणी विचारतही नाही. शिवाय रुग्णांच्या संपर्कातील लोकांना निदान विलगीकरणात तरी ठेवणे अपेक्षित असताना तसे होत नाही.
गावांमध्ये वाॅच कोणाचा?
ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणासाठी ग्रामपातळीवर समित्या स्थापन केल्या. मात्र, या समित्याच कार्यरत नसल्याचे चित्र अनेक गावांत आहे. रुग्ण आढळला तरीही ही मंडळी पुढची जबाबदारी पार पाडत नाहीत.
समितीतील अनेक जण मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे थंडीत कुडकुडणाऱ्याला माळावरच्या जाळाचा काय फायदा होणार, अशी स्थिती आहे.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच नाही
ग्रामीण भागात रुग्ण आढळला तर त्यांच्या घरातील लोकांनाही कोणी तपासणीला बोलावत नाही. अंगणवाडी कार्यकर्ती, आशा यांनी लक्ष घातले तर तेव्हा संपर्कातील लोकांना नेले जाते. आराेग्यातील काही कर्मचारी व शिक्षकांना रुग्ण घरी आल्यानंतर विलगीकरणात राहतो की नाही, हे तपासण्यासह स्टिकर लावण्याचे काम दिले. मात्र, तेही १०० टक्के होत नाही. तुरळक ठिकाणी होते.
जिल्ह्यातील आतापर्यंतचे रुग्ण ८९६८
ग्रामीण भागातील रुग्णसंख्या ४२००
गावामध्ये होम आयसोलेट रुग्ण ०००
हिंगोली जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून लागलीच तपासण्या केल्या जात आहेत. अजूनही रुग्णांसाठी दीड हजार खाटा उपलब्ध असल्याने होम आयसोलेशन केले जात नाही.
डॉ. शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी.