चार पिढ्यांपासून चालू असलेला भाजीपाला विक्रीचा व्यवसाय कोरोनामुळे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:25 IST2021-04-03T04:25:57+5:302021-04-03T04:25:57+5:30
हिंगोली : एक नाही, दोन नाही तर चार पिढ्यांपासून चालू असलेला भाजीपाला विक्रीचा व्यवसाय कोरोनाने बंद पाडला आहे. त्यामुळे ...

चार पिढ्यांपासून चालू असलेला भाजीपाला विक्रीचा व्यवसाय कोरोनामुळे बंद
हिंगोली : एक नाही, दोन नाही तर चार पिढ्यांपासून चालू असलेला भाजीपाला विक्रीचा व्यवसाय कोरोनाने बंद पाडला आहे. त्यामुळे लेकरांबाळांना उपाशीपोटी झोपावे लागत आहे. दुकानच उघडे नसल्यामुळे काय खावे, हाही प्रश्न पडला आहे.
कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात २९ मार्च ते ४ एप्रिल अशी सात दिवसांची टाळेबंदी घोषित केली आहे . टाळेबंदीला भाजीपाला विक्रेत्यांचा विरोध नाही. पण आजमितीस भाजीपाला विक्री बंद असल्यामुळे लेकरांबाळांची चिंता वाटत आहे. आज पाच दिवस लोटले आहेत. घरात शेरभर ही धान्य नाही. रोज भात शिजवून खावा लागत आहे. मोठी माणसे उपाशी झोपू शकतात. लेकरे भात खाऊन झोपत आहेत, याचेच वाईट वाटत आहे. आमची चौथी पिढी असून असे दिवस कधीच पाहिले नाहीत.
टाळेबंदीचा मोठ्या व्यावसायिकांना काहीच फरक पडत नाही. पण आम्हाला मात्र खूप फरक पडतो. कारण रोजीरोटी यावर आहे. सकाळ झाली की आम्ही भाजी मार्केटमध्ये येऊन बसतो. आमच्या आधी ठोक विक्रेते येऊन बसतात. यानंतर ठोक विक्रेते भाज्यांचे भाव सांगतात. तेव्हा कुठे घासघीस केल्यानंतर आमच्या पदरात भाज्या पडतात. सकाळी सात ते सायंकाळी सात असे १४ घंटे भाजी विक्रीचा व्यावसाय केल्यानंतर ४०० रूपये मिळतात. या पैशातून आम्ही बागवान मंडळी घर चालवतो. टाळेबंदी जरूर करा, पण आम्हाला व्यवसायात चार तास तरी सूट द्या, अशी विनंती किरकोळ विक्रेत्या बागवान मंडळीनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
भाज्यांना अत्यावश्यक सेवेत घ्यावे
अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या तीन गरजा आहेत. खरे पाहिले तर भाजीपाला ही अत्यावश्यक सेवेत येतो. पण त्याकडे कोणी गांभीर्याने पाहत नाही. आमच्याबरोबर भाजीपाला उत्पादक ही उपाशी राहत आहे. उत्पादकांचा भाजीपाला सडून जात आहे. टाळेबंदी आवश्य करावी. पण भाजीपाला विक्रेत्यांना सूट द्यावी,अशी मागणी खालेख बागवान, एजाज बागवान, सलीम बिचू, मुदतशीर बागवान, मुस्ताख शेख या किरकोळ विक्रेत्यांनी केली आहे.
फोटो