कोरोनामुळे वाजंत्री व्यावसायिकांवर उपासमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:31 IST2021-05-11T04:31:13+5:302021-05-11T04:31:13+5:30
हिंगोली : ज्या व्यवसायांवर कुटुंबाचा गाडा चालतो तोच व्यावसाय कोरोना महामारीमुळे दोन वर्षांपासून बंद पडला आहे. उदरनिर्वाहाचे साधनच सद्य:स्थितीत ...

कोरोनामुळे वाजंत्री व्यावसायिकांवर उपासमार
हिंगोली : ज्या व्यवसायांवर कुटुंबाचा गाडा चालतो तोच व्यावसाय कोरोना महामारीमुळे दोन वर्षांपासून बंद पडला आहे. उदरनिर्वाहाचे साधनच सद्य:स्थितीत बंद पडल्याने सर्व साहित्य गुंडाळून ठेवण्याची वेळ आली आहे, अशी व्यथा वाजंत्री व्यावसायिकांनी मांडली.
२३ मार्च २०२० पासून कोरोनाने सर्वत्र शिरकाव केला आहे. तेव्हापासून वाजंत्री व्यावसायिकांची उपासमार होत आहे. लग्न, विविध धार्मिक कार्यक्रम असले की वाजंत्री व्यावसायिकांना सुगीचे दिवस असायचे. परंतु सध्या सर्वच कार्यक्रम बंद असल्यामुळे हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. कोरोनाआधी दिवसाकाठी हजार ते दीड हजार रुपये हातात पडायचे. परंतु, गत दोन वर्षांपासून तेही हातात पडत नाही. सर्वच कार्यक्रमांवर बंदी घातल्यामुळे वाद्य गुंडाळून ठेवण्याची वेळ आमच्यावर आली आहे. वाजंत्री प्रमुखांसह सहकाऱ्यांनाही उपासमारीचा सामना करावा लागत आहे.
जिल्ह्यात वाजंत्री व्यावसायिक नाही म्हटले तरी दीडशेच्या आसपास तर हिंगोली शहरात पन्नास ते साठ आहेत. गतवर्षी शासनाने माणसी पाच किलो धान्य दिले होते. परंतु, यावर्षी मात्र काहीही दिले नाही. मोठी माणसे कशीही राहू शकतात. परंतु, लहान मुले उपाशी कशी राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गतवर्षीही लग्न तिथी भरपूर प्रमाणात होत्या. एप्रिल महिन्यात ८ तिथी होत्या. मे महिन्यात १६ तिथी आहेत. परंतु, कोरोना महामारीमुळे याही तिथी हातच्या जात आहेत. येणाऱ्या जून महिन्यात ८ तिथी आहेत. सदरील ८ तिथी पदरात पडतात की नाही, याची चिंता लागली आहे. शासनाने घरगुती कार्यक्रमांना परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.
वाजंत्री व्यावसाय बंद पडल्यामुळे कुटुंबाची उपासमार होत आहे. घरात नाही म्हटले तरी पाच ते सहा सदस्य आहेत. जिल्ह्यात वाजंत्री व्यावसायिकही भरपूर प्रमाणात आहेत. शासनाने वाजंत्री व्यावसायिकांना आर्थिक मदत करून त्यांची उपासमार थांबवावी.
-प्रसाद डोके, वाजंत्री व्यावसायिक
फोटो १