हक्काबाबत ग्राहक जागृत झाल्याने कोरोना काळातही तक्रारी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:57 IST2021-03-04T04:57:04+5:302021-03-04T04:57:04+5:30

हिंगोली : आपल्या न्याय हक्कांसाठी प्रत्येकजण जागरूक झाला आहे. त्यामुळेच येथील जिल्हा ग्राहक न्याय मंचात २०१९ च्या तुलनेत ...

Complaints also increased during the Corona period as consumers became aware of the rights | हक्काबाबत ग्राहक जागृत झाल्याने कोरोना काळातही तक्रारी वाढल्या

हक्काबाबत ग्राहक जागृत झाल्याने कोरोना काळातही तक्रारी वाढल्या

हिंगोली : आपल्या न्याय हक्कांसाठी प्रत्येकजण जागरूक झाला आहे. त्यामुळेच येथील जिल्हा ग्राहक न्याय मंचात २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये कोरोना आजार असूनही तक्रार दाखल करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

आपली कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये, यासाठी आता प्रत्येकजण जागरूक झाला आहे. तरीही ग्राहकांची फसवणूक झाल्यास ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या किंवा ग्राहक सेेवेत त्रुटी देणाऱ्या विक्रेता, पुरवठादाराविरुद्ध जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे तक्रार दाखल करता येते. जिल्हा ग्राहक न्याय मंचात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ असल्याने व लवकर न्याय मिळत असल्याने ग्राहकांचा जिल्हा ग्राहक न्याय मंचावर विश्वास वाढला आहे. त्यामुळेच २०१९ मध्ये २३४ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यात पुन्हा भर पडत २०२० मध्ये ६४६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे २०२० मध्ये कोरोना आजारामुळे लॉकडाऊन असले तरीही ग्राहकांनी न्याय हक्कांसाठी घराबाहेर पडत जिल्हा ग्राहक न्याय मंचाची पायरी चढली. दरम्यान, २०१९ मध्ये ४३, तर २०२० मध्ये ३० तक्रारी निकाली काढण्यात जिल्हा ग्राहक न्याय मंचास यश आले आहे.

तक्रारी कशा स्वरूपाच्या होत्या

येथील जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे सर्वच स्तरातील ग्राहकांनी न्याय हक्कांसाठी धाव घेतली आहे. वैयक्तिक तक्रारींसह काही गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये तक्रारींचा आकडा दुपटीपेक्षा अधिक वाढला असल्याचे सांगण्यात येत आहे

तक्रारी नेमक्या काय?

१) येथील जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे ग्राहकांनी विविध तक्रारी दाखल केल्या आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत पीक विमा, बियाणे संदर्भातील तक्रारींचा समावेश आहे.

२) बँक, पतपेढी, एलआयसी, इन्शुरन्स या संदर्भातीलही तक्रारी जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे दाखल झाल्या आहेत. जिल्हा ग्राहक न्याय मंचात लवकर न्याय मिळत असल्यानेच तक्रारदार ग्राहकांची संख्या वाढत आहे.

प्रतिक्रिया

ग्राहक आपल्या न्याय हक्कांबाबत जागृत झाले आहेत. ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ असून, निकाल लवकर लागतो. त्यामुळे ग्राहकांना ग्राहक मंच जवळचा वाटत आहे. २०२० मध्येही न्याय हक्कांसाठी ग्राहकांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली आहे. त्यांच्यात विश्वास वाढावा, न्याय लवकर मिळावा यासाठी ग्राहक मंचाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत.

- जे. ए. सावळेश्वरकर, सदस्य, जिल्हा ग्राहक न्याय मंच

Web Title: Complaints also increased during the Corona period as consumers became aware of the rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.