कारवाईचा बडगा उगारताच तक्रारदारांची घेतली जातेय दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST2021-07-07T04:36:47+5:302021-07-07T04:36:47+5:30
हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत बसावे लागत होते. पोलीस ठाणे अंमलदाराच्या कामाची वेळ संपत ...

कारवाईचा बडगा उगारताच तक्रारदारांची घेतली जातेय दखल
हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत बसावे लागत होते. पोलीस ठाणे अंमलदाराच्या कामाची वेळ संपत आली असताना एखादा नागरिक गुन्हा दाखल करण्यासाठी आल्यास अशा वेळी दुसरा ठाणे अंमलदार येईपर्यंत वाट पाहावी लागत होती. यात नागरिकांना नाहक ताटकळत थांबावे लागत होते. नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात येताच पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांनी कारवाईचा बडगा उगारला. नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण तत्काळ करता यावे, म्हणून पोलीस ठाण्याच्या दर्शनीय भागात सूचनाही डकविली. तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. पोलीस निरीक्षक कच्छवे यांनी कारवाईचा बडगा उगारताच पोलीस ठाणे अंमलदार कामाला लागले. गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेतली जात आहे. तसेच किरकोळ घरगुती वाद असल्यास अशा नागरिकांचे समुपदेशन ही केले जात आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
पती-पत्नीमधील वाद समुपदेशनाने मिटविला
हिंगोली शहर पोलीस ठाण्यात ५ जुलै रोजी दुपारी एक जोडपे एकमेकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते. त्यांच्यातील वादही किरकोळ होता. पोलीस ठाणे अंमलदारांनी दोघांचेही म्हणणे ऐकून घेतले. यावेळी पती-पत्नीमधील वाद हा किरकोळ कारणावरून झाल्याचे लक्षात येताच ठाणे अंमलदारांनी दोघांचेही समुपदेशन केले. दोघांनाही ठाणे अंमलदाराचे म्हणणे पटल्याने गुन्हा दाखल करण्यासाठी आलेले जोडपे आनंदाने घरी परतले.