आओ जाओ घर तुम्हारा ! दुपारी तीन वाजेनंतर तपासणीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:29 IST2021-03-18T04:29:30+5:302021-03-18T04:29:30+5:30
कोरोना आजार वाढू लागला; कोरोना कसा रोखणार? हाही यक्ष प्रश्न हिंगोली: जिल्ह्यात मागील दीड महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने ...

आओ जाओ घर तुम्हारा ! दुपारी तीन वाजेनंतर तपासणीच नाही
कोरोना आजार वाढू लागला; कोरोना कसा रोखणार? हाही यक्ष प्रश्न
हिंगोली: जिल्ह्यात मागील दीड महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले असतानाही तपासणी मात्र दुपारी तीन वाजेपर्यंतच होताना दिसून येत आहे. त्यानंतर बसस्थानक, रेल्वेस्टेशन येथे प्रवासी बिनधास्त फिरताना आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोना कसा रोखणार? हा प्रश्न पडला जात आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहताच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी १ ते ७ मार्च दरम्यान सात दिवसांची संचारबंदी लागू केली होती. या दरम्यान, जिल्ह्यातील हिंगोली, वसमत आणि कळमनुरी आगारातील बसेस बाहेरगावी सोडण्याचे बंद केले होते. असे असताना पर जिल्ह्यातील बसेस मात्र आगारात येऊन जात होत्या. जिल्हा प्रशासनाने १ मार्चपासून बसमधून आलेल्या प्रवाशांची तसेच जाणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. परंतु, ही वेळ तीन वाजेपर्यंतची देण्यात आली आहे. त्यामुळे तीन नंतर मात्र सर्वकाही आलबेल असल्याचे पहायला मिळत आहे.
बॉक्स
लांब पल्ल्याच्या गाड्यांची तपासणी नाही
पुणे, सोलापूर, औरंगाबाद या लांब पल्ल्याच्या बसेस तिन्ही आगारातून सोडण्यात येत आहेत. परंतु, आलेल्या व जाणाऱ्या प्रवाशांची काही तपासणी होताना दिसून येत नाही. विशेष म्हणजे बहुतांश प्रवासी हे विनामास्कच बसेसमध्ये चढत असल्याचे पहायला मिळत आहे.
इतर राज्यातील बसेस सुरू; पण तपासणी होईना
हिंगोली ते हैदराबाद आणि वसमत ते हैदराबाद ही बस १ ते ७ मार्च नंतर सुरू करण्यात आली आहे. ही बस पर राज्यात जात असल्यामुळे प्रवासी संख्याही या बसला मोठ्या प्रमाणात असते. परंतु, म्हणावी तेवढी काही काळजी घेतली जात नाही. कोरोना आजार वाढू लागल्याने महामंडळाने बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना मास्क असल्याशिवाय प्रवेश देऊ नये. यासाठी महामंडळाने चालक, वाहकांना सूचना देणे गरजेचे आहे.
कोरोना तपासणीची वेळ वाढविली जाईल
जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण वाढलेले पाहून १ मार्चपासून बसस्थानकात उतरलेल्या व जाणाऱ्या प्रवाशांची अँटिजन तपासणी करण्यात येत आहे. यासाठी आरोग्य विभागाचे पथक नेमण्यास सांगण्यात आले. सर्व बसस्थानकात ही पथके राहतील. शिवाय बसस्थानकातच बस आणून उभी करायची असल्याने सीमेवर तपासणी नाही. जर तीननंतर तपासणी होत नसेल तर तशा सूचना दिल्या जातील.
-रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी, हिंगोली