रक्तपेढी ऑक्सिजनवर; दोन-तीन दिवस पुरेल एवढाच साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:30 IST2021-04-04T04:30:58+5:302021-04-04T04:30:58+5:30
हिंगोली : जिल्ह्यात शासकीय रुग्णालय वगळता जिल्ह्यात कुठेही रक्तपेढी नाही. एकाच रक्तपेढीतून रक्ताचा पुरवठा केला जातो. जिल्हा रुग्णालयातील ...

रक्तपेढी ऑक्सिजनवर; दोन-तीन दिवस पुरेल एवढाच साठा
हिंगोली : जिल्ह्यात शासकीय रुग्णालय वगळता जिल्ह्यात कुठेही रक्तपेढी नाही. एकाच रक्तपेढीतून रक्ताचा पुरवठा केला जातो. जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा असल्याचे रक्तपेढी संकलकांच्यावतीने सांगण्यात आले.
जिल्ह्याला रक्तपुरवठा करण्यासाठी शासकीय रक्तपेढी एकच आहे. तसेच वसमत येथील महिला रुग्णालयात एक रक्त साठवण कक्ष सद्यस्थितीत कार्यरत आहे. दरवर्षी एप्रिल ते जून या कालावधीत रक्तसंकलन कमीच होते. त्यामुळे बहुतांशवेळा रक्ताचा तुटवडा जाणवत असतो.
गतवर्षी कोरोनाचा संसर्ग असतानासुद्धा जिल्ह्यातील रक्तदान शिबिर आयोजकांनी वेळोवेळी रक्तदान शिबिरे घेऊन कमतरता भासू दिली नाही. सध्या जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये ‘ए’ पॉझिटिव्ह १०, ‘बी’ पॉझिटिव्ह १, ‘ओ’ पॉझिटिव्ह १५ असून, सध्या रक्तपेढीमध्ये एकूण २६ बाटल्या (बॅग) साठा उपलब्ध आहे. हा २६ बाटल्यांचा साठा नजीकच्या दोन-तीन दिवसांपुरताच आहे. पुढे रक्ताची तीव्र कमतरता जाणवणार आहे. रक्तपेढीतील जनसंपर्क अधिकारी बंडू नरवाडे व सामाजिक कार्यकर्ते आत्माराम जटाळे हे रक्तदान आयोजकाला फोन करून रक्तदान शिबिरासाठी प्रवृत्त करीत आहेत.
रक्तपेढीच्यावतीने आवाहन करण्यात येत की, स्वेच्छेेने रक्तपेढीत येऊन रक्तदान करावे किंवा रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तदान करावे. जेणेकरून हिंगोली जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही.
प्रतिक्रिया
यावर्षी रक्तदात्यांनी कोरोना लसीकरणापूर्वी व दुसऱ्या लसीकरणाचा डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनंतर स्वेच्छेेने
रक्तदान करून रक्तपेढीस सहकार्य करावे. तसेच जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करणे गरजेचे आहे.
- दीपमाला पाटील, रक्तपेढी संकलक, हिंगोली