कर्जमुक्ती योजनेमुळे पीककर्ज वाटपात बँका मेहरबान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:31 IST2021-03-23T04:31:42+5:302021-03-23T04:31:42+5:30

हिंगोली : दुष्काळ, अतिवृष्टीमुळे हाती आलेले पीक हिरावून घेतले जात आहे. त्यामुळे पीक कर्जाचे पुनर्गठण करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत ...

Banks are kind in allocating peak loans due to debt relief scheme | कर्जमुक्ती योजनेमुळे पीककर्ज वाटपात बँका मेहरबान

कर्जमुक्ती योजनेमुळे पीककर्ज वाटपात बँका मेहरबान

हिंगोली : दुष्काळ, अतिवृष्टीमुळे हाती आलेले पीक हिरावून घेतले जात आहे. त्यामुळे पीक कर्जाचे पुनर्गठण करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. थकीत कर्जामुळे बँका पुन्हा पीक कर्ज देण्याचे नावही घेत नव्हत्या. मात्र, कर्जमुक्तीनंतर पीक कर्ज देण्यास बँकांनी सुरुवात केल्याने कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे.

खरीप व रबी दाेन्ही हंगामांसाठी बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. घेतलेले पीक कर्ज ३१ मार्चपूर्वी भरणे आवश्यक असते. मात्र, सततची नापिकी व इतर संकटांमुळे शेतकरी कर्ज भरू शकत नाहीत. थकीत कर्जदाराला बँका पुन्हा नव्याने कर्ज देत नाहीत. मात्र, २०१६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान याेजना राबविण्यात आली. या याेजनेंतर्गत २००९ ते २०१६ या कालावधीतील थकीत कर्ज माफ केले. मात्र, प्रत्यक्षात कर्जमाफीची रक्कम मिळण्यास उशीर झाला. तसेच २०१६ नंतरचेही कर्ज माफ हाेईल, या उद्देशाने अनेक शेतकऱ्यांनी पीककर्ज भरले नाही. थकीत कर्जदारांची संख्या वाढतच गेली. त्यामुळे २०१७ ते २०२० या कालावधीत कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली असल्याचे दिसून येते. त्यानंतर, पुन्हा विद्यामान राज्य शासनाने २१ डिसेंबर २०१९ राेजी महात्मा फुले कर्जमुक्ती याेजनेची घाेषणा केली. या याेजनेंतर्गत पुन्हा ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत कर्ज माफ केले. याचा जिल्ह्यातील जवळपास ९० हजार ६३६ शेतकऱ्यांना लाभ मिळाला. त्यामुळे २०२०-२१ या आर्थिक वर्षात कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सव्वा टक्क्याने वाढली असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात २०२०-२१ यावर्षी विविध बँकांमार्फत १४४३ कोटी ७४ लाखांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. याअंतर्गत १ लाख ११ हजार शेतकऱ्यांना ७२५ कोटी ४७ लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले असून याची टक्केवारी ५०.२५ असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेतील अधिकाऱ्यांनी सांगितली.

पीक कर्जमाफीनंतर पुन्हा आखाडा बाळापूर येथील भारतीय स्टेट बँकेतून पीक कर्ज उचलले आहे. कर्जमाफीमुळेच पुन्हा पीक उचलता आले. या रकमेतून खरीप हंगामातील पेरणी करता आली.

-शांताबाई सुधाकर माखणे, साळवा

सततची नापिकी व अतिवृष्टीमुळे घेतलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठण करताना अडचणी येत होत्या. शासनाच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला. त्यानंतर बँकेने पुन्हा पीक कर्ज दिले आहे. खरीप हंगामातील पेरणीसाठी रक्कम कामी आली.

- अरुणा देवीदास माखणे, साळवा

कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या - ९०६३६

खरीप पीक कर्जाची आकडेवारी (रक्कम रु. लाखात)

२०१६-१७ -९६८५०.००- ६५७११.३७

२०१७-१८ -८८५२५.०० - १५५८०.९९

२०१८-१९ - ९५९००.०० - २७३१८.८१

२०१९-२० - ११६१९६.७७ -१९२३४.५२

२०२०-२१ - ११६८९५.०० -२०७५८.५३

Web Title: Banks are kind in allocating peak loans due to debt relief scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.