हळदीसाठी शेतकऱ्यांनी प्रमाणीकरण करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:46 IST2021-02-23T04:46:20+5:302021-02-23T04:46:20+5:30
कृषीविज्ञान केंद्र, तोंडापूर आणि किसान यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन पद्धतीने "स्थानिक बाजारपेठेसाठी व निर्यातीसाठी सेंद्रिय हळद शेतीचे प्रमाणीकरण" या ...

हळदीसाठी शेतकऱ्यांनी प्रमाणीकरण करण्याचे आवाहन
कृषीविज्ञान केंद्र, तोंडापूर आणि किसान यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन पद्धतीने "स्थानिक बाजारपेठेसाठी व निर्यातीसाठी सेंद्रिय हळद शेतीचे प्रमाणीकरण" या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी देशमुख म्हणाले, सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण करण्यासाठी ३ वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, चांगल्या पद्धतीने सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यास दोन वर्षांनीसुद्धा प्रमाणीकरण करता येऊ शकते. सेंद्रिय शेतीची नोंदणी केल्याबरोबर "सर्टिफाइड ऑरगॅनिक ग्रेड-१" असे लेबल लावून त्याचप्रमाणे प्रमाणीकरण संस्थेचा लोगो लावून मालाची विक्री करण्यास सुरुवात करता येते. दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षीसुद्धा याचप्रकारे ग्रेड-२ आणि ग्रेड-३ लिहून विक्री करता येते. प्रमाणीकरण झाल्यानंतर इंडिया ऑरगॅनिक हा लोगो लावून मालाची विक्री करता येते, अशी माहिती दिली.
कृषीविज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्र व प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी देशातील हळदीचे निर्यातदार हे सेंद्रिय हळदीची मागणी करीत असून त्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनीचे प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया शक्य तितक्या लवकर करावी. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक स्वरूपात शेतजमिनीचे प्रमाणीकरण करावयाचे असल्यास त्यासाठी वार्षिक सुमारे १५ हजार रुपये खर्च येतो आणि त्यासाठी पुणे येथील नॅचरल ऑरगॅनिक सर्टिफिकेशन एजन्सी (NOKA) यांची मदत घेता येईल. लहान शेतकऱ्यांसाठी गटाने नोंदणी करणे शक्य असून त्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढाकार घेतल्यास २०० शेतकऱ्यांसाठी वार्षिक सुमारे ४० हजार रुपये खर्च होईल. यामुळे हळदीला चांगला भाव मिळेल, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन प्रा. अनिल ओळंबे यांनी केले तर दीपक खेमलापुरे यांनी आभार मानले.