आरटीईच्या ५३० जागांसाठी ९९० अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:26 IST2021-04-03T04:26:16+5:302021-04-03T04:26:16+5:30
हिंगोली : दुर्बल व वंचित घटकातील बालकांनाही मोठ्या खासगी शाळांत प्रवेश मिळावा यासाठी शाळांत आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव ...

आरटीईच्या ५३० जागांसाठी ९९० अर्ज
हिंगोली : दुर्बल व वंचित घटकातील बालकांनाही मोठ्या खासगी शाळांत प्रवेश मिळावा यासाठी शाळांत आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. या जागांवर प्रवेश देण्यासाठी ३० मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. अखेरच्या दिवसापर्यंत ५३० जागांसाठी तब्बल ९९० अर्ज दाखल झाले आहेत.
खासगी शाळांत दुर्बल व वंचित घटकातील बालकांनाही शिक्षण घेता यावे, यासाठी बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत अशा शाळांत २५ टक्के जागा रिक्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील ७९ शाळांची मोफत प्रवेशासाठी निवड करण्यात आली असून यातील ५३० जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी ३ मार्चपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. मात्र या काळात जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याने अनेकांना अर्ज भरता आले नव्हते. त्यामुळे अर्ज सादर करण्यास शिक्षण विभागाने ३० मार्चपर्यंत मुदतवाढ दिली. त्यानुसार जिल्ह्यातील तब्बल ९९० पालकांनी आपल्या पाल्याचे ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे खासगी शाळांत शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
तालुका शाळा राखीव जागा
औंढा १२
वसमत १८
हिंगोली २६
कळमनुरी १६
सेनगाव ०७
आता लक्ष लॉटरीकडे
२५ टक्के मोफत प्रवेशासाठी जिल्हाभरातून ९९० पालकांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज सादर करण्याची मुदत संपली असून लॉटरी पद्धतीने सोडत होणार आहे. सोडतीनुसार रिक्त जागांवर बालकांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे आता लॉटरी पद्धतीने होणाऱ्या सोडतीकडे लक्ष लागले आहे.
आरटीई अंतर्गंत जिल्ह्यात किती शाळांची नोंदणी - ७९
किती राखीव जागा - ५३०
किती अर्ज - ९९०
... तर मोठ्या शाळेचे स्वप्नही पाहू शकत नाही
घरची परिस्थिती बेताची असल्याने पैसे भरून खासगी शाळेत पाल्याला प्रवेश देणे शक्य नाही. आता खासगी शाळेत मोफत प्रवेश मिळावा, यासाठी ऑनलाईन अर्ज भरला आहे. पाल्याला मोफत प्रवेश मिळाल्यास मोठ्या शाळेत शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
-भाऊसाहेब पाईकराव, पालक, हिंगोली
आरटीई मोफत प्रवेश प्रक्रिया राज्यस्तरावरून राबविली जाते. जिल्ह्यातील ५३० जागांसाठी ९९० अर्ज दाखल झाले असून प्रवेशासाठीच्या सोडतीची तारीख सध्या तरी जाहीर झाली नाही. लवकरच जाहीर होईल.
- संदीपकुमार सोनटक्के, शिक्षणाधिकारी (प्रा.)
आरटीईअंतर्गंत मोफत प्रवेश मिळेल व मोठ्या शाळेत शिकविण्याचे स्वप्न पूर्ण होईल, या अनुषंगाने ऑनलाईन अर्ज दाखल केला आहे. आता सोडतीकडे लक्ष लागले आहे.
- गणेश साखरे, पालक
दुर्बल व वंचित घटकातील बालकांनाही आता मोठ्या खासगी शाळेत मोफत शिक्षण घेता येणार आहे. शैक्षणिक फी शासन अदा करणार असल्याने मोफत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
- शंकर औटे, पालक