हिंगोलीतही म्युकरमायकोसिसचे ८ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:30 IST2021-05-13T04:30:10+5:302021-05-13T04:30:10+5:30

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. ते आठही रुग्ण बरे झाले आहेत. त्यातील एक जण ...

8 patients with mucormycosis in Hingoli too | हिंगोलीतही म्युकरमायकोसिसचे ८ रुग्ण

हिंगोलीतही म्युकरमायकोसिसचे ८ रुग्ण

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. ते आठही रुग्ण बरे झाले आहेत. त्यातील एक जण गंभीर असल्याने त्याला नांदेडला हलविण्यात आले होते, तर एकावर सर्जिकल डिब्राईटमेंटची पद्धती वापरावी लागली. तिघांना एम्पोटेरेसिन बी या इंजेक्शनचा फायदा झाला. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये साधारण २० ते २५ दिवसांनी म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसून येतात. त्यामुळे या काळात वेगळी काही लक्षणे आढळली तर रुग्णांनी वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे. हिंगोलीत जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात आलेल्या रुग्णांमधूनच हे रुग्ण आढळून आले असून, त्यांना ओरल ॲण्ड मॅक्झिलोफेसिएल सर्जन डॉ. फैसल खान यांच्याकडे रेफर केल्यानंतर हा प्रकार समोर आला होता. याबाबत डॉ. फैसल खान म्हणाले, आपल्याकडे आढळून आलेल्या आठ रुग्णांबाबत वरिष्ठांना अहवाल देण्यात आला आहे. या सर्व रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. अजूनही या रुग्णांवर आमची यंत्रणा लक्ष ठेवून आहे. कोरोनानंतर म्युकरमायकोसिसचा धोका असलेल्यांनी २० दिवसांनी याबाबतची तपासणी करून घेतल्यास संभाव्य धोका टाळता येणार आहे.

म्युकरमायकोसिस म्हणजे काय?

म्युकरमायकोसिस दुर्मीळ असला तरी नवा नाही. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या, अतिदक्षता विभागात असलेल्या तसेच अवयव प्रत्यारोपण केल्या जाणाऱ्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस म्हणजे म्युकरमायकोसिस होणे तसेच त्यामुळे मृत्यू होणे, अशा गोष्टी पूर्वीपासूनच घडत आहेत. पण, कोविड १९मुळे त्याची लागण होत असल्याची गोष्ट नवी आणि धोकादायक आहे. कोविड-१९मधून चांगल्या पद्धतीने बरे होत असलेल्या रुग्णांना याची लागण होण्याचा वेग अचानक वाढला आह. ही बाब काळजीची आहे. हा आजार झायगोमायकोसिस म्हणूनही ओळखला जातो. मागील २० ते २५ दिवसांत दंतचिकित्सकांकडे कोरोनातून बरे झालेल्यांना म्युकरमायकोसिस होत असल्याचे आढळले आहे.

म्युकरमायकोसिस नावाच्या बुरशीमुळे या आजाराचा संसर्ग होतो. ती पर्यावरणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असते. मात्र, जेव्हा मानवी शरीराची प्रतिकारशक्ती क्षीण होते, तेव्हा तिचा संसर्ग शरीरात होतो. या बुरशीचा कण श्वासाद्वारे शरीरात गेल्यावर फुफ्फुस तसेच सायनसवर त्याचा दुष्परिणाम होतो. खुल्या जखमेतूनही ही बुरशी शरीरात प्रवेश करते. म्युकरमायकोसिसची लागण संसर्गजन्य नाही. एकापासून दुसऱ्याला किंवा प्राण्यांपासून माणसाला होण्याची धोका नाही. योग्यवेळी निदान व बुरशीप्रतिकारक उपचार केल्यास रुग्ण बरा होतो.

यात तातडीने निदान केल्यास बुरशी प्रतिकारक उपचार पद्धती वापरता येते. पण, संसर्ग शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहोचल्यास शस्त्रक्रिया करावी लागू शकते. त्यामुळे उपचारास विलंब झाल्यास होणारी गुंतागुंत व दृष्टी जाण्याचा धोका आहे. नाक व जबड्यांच्या हाडावर दुष्परिणाम होतो. पंधरा दिवसांपर्यंत पोहोचल्यास मृत्यूचा धोकाही होऊ शकतो. त्यामुळे मधुमेह व इतर गंभीर आजार असलेल्यांनी एकदा तरी मुख आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही डॉ. खान यांनी केले.

म्युकरमायकोसिसचा धोका कोणाला ?

मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा असलेल्या रुग्णांना म्हणजे ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत आहे, अशांनाच या आजाराचा जास्त धोका आहे.

आजाराची लक्षणे कोणती?

तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, दातातून पू येणे, दात हलणे, जबड्याचे हाड उघडे पडणे, डोके दुखणे, सायनस रक्तसंचय, डोळ्यांना सूज येणे, डोळ्यांची हालचाल कमी होणे, चेहऱ्यावर सूज येणे, सूज आलेल्या ठिकाणी त्वचा काळी पडणे, नाकात अडथळे होणे, नाकात काळे सुके मल तयार होणे आदी लक्षणे दिसून येतात.

कोविड १९ आणि म्युकरमायकोसिस

म्युकरमायकोसिस हा आजार मधुमेह असणारे रुग्ण, स्टेरॉईडवर असणारे रुग्ण यांच्यात कमी रोगप्रतिकारशक्तीमुळे होतो, तर कोविड १९ उपचार घेत असलेल्या रुग्णांना स्टेरॉईड्स आणि आणखी काही औषधी देण्यात येतात. जेणेकरून कोरोनातून या रुग्णांची सुटका होईल. मात्र, यामुळेच त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते आणि म्युकरमायकोसिसचा धोका वाढतो.

म्युकरमायकोसिसचे निदान कसे करायचे?

सीटीस्कॅन, इंडोस्कोपी व बायोप्सीच्या साह्याने म्युकरमायकोसिसचे निदान करणे सोपे आहे. वरील लक्षणे आढळल्यास दंत अथवा मुख्य आरोग्य तज्ज्ञांकडून सल्ला घेणे आवश्यक आहे.

Web Title: 8 patients with mucormycosis in Hingoli too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.