कोरोनाकाळात झाल्या ५५ आत्महत्या ; भावनिक, आर्थिक आधार देण्याची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:20 IST2021-06-20T04:20:55+5:302021-06-20T04:20:55+5:30

हिंगोली : कोरोनामुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला असून, अनेकांच्या हातचा रोजगार गेला आहे. उद्योग, व्यवसाय ठप्प पडले, तसेच शेतमालाचेही ...

55 suicides during the Corona period; The need for emotional, financial support! | कोरोनाकाळात झाल्या ५५ आत्महत्या ; भावनिक, आर्थिक आधार देण्याची गरज!

कोरोनाकाळात झाल्या ५५ आत्महत्या ; भावनिक, आर्थिक आधार देण्याची गरज!

हिंगोली : कोरोनामुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला असून, अनेकांच्या हातचा रोजगार गेला आहे. उद्योग, व्यवसाय ठप्प पडले, तसेच शेतमालाचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. झालेले नुकसान कसे भरून काढायचे, कुटुंबाचा भार कसा पेलायचा, या चिंतेतून ५५ जणांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने प्रशासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. आताही रुग्ण आढळून येत असले तरी निर्बंध शिथिल केल्याने बाजारपेठ पुन्हा गजबजली आहे. मागील दीड वर्षांपासून कोरोना संसर्गाने थैमान घातले होते. या काळात सर्व व्यवहार, उद्योग ठप्प पडले होते. कामगार, नोकरदारांच्या हातचा रोजगार गेल्याने आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागले. शेती पिकूनही शेतमाल विक्री करता आला नाही. त्यामुळे उद्योग, शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे, याची चिंता सतावत होती. त्यामुळे हिंगोली ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तसेच हिंगोली शहर पोलीस ठाणे अंतर्गत कोरोना काळात ५५ जणांनी टोकाचे पाऊल उचलले. यात युवकांपासून ते ज्येष्ठांपर्यंतच्या आत्महत्या केलेल्यांचा समावेश आहे. यात बँकेचे कर्ज कसे फेडायचे, आडतमध्ये नुकसान, दारूच्या नशेत, परीक्षेत नापास झाल्यामुळे, वेडेपणाच्या भरात, मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज, नोकरी लागत नाही आदी कारणांमुळे आत्महत्या केली आहे.

कुटुंबाने काळजी घेण्याची गरज

आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त कमावत्या व्यक्तींचा समावेश आहे. आर्थिक स्थैर्य नसल्याने कमावत्या व्यक्ती निराशाच्या गर्तेत सापडण्याची शक्यता असते. याचा परिणाम कुटुंबावरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी घरातील सर्वच सदस्यांनी एकमेकांना धीर देत नकारात्मक विचार येणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे आहे.

मानसोपचार तज्ज्ञ काय म्हणतात...

कोरोनामुळे नोकरी, रोजगार गेल्यामुळे नकारात्मक विचार येण्याची शक्यता असते. अशा वेळी घरातील प्रमुखाला कुटुंबीयांनी आधार देत सावरण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे, तसेच नकारात्मक विचार येत असल्यास यातून सावरण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

- डॉ. दीपक डोणेकर, मानसोपचार तज्ज्ञ, हिंगोली.

हे दिवसही जातील ....

कोरोनाचे संकट काय एकट्यावरच आले नाही. सर्वच घटकांवर याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे संकटामुळे खचून न जाता थोडा धीर धरावा. हे संकटही हळूहळू निघून जाईल. अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना शासन स्तरावरून मदत करण्याचा प्रयत्न होत आहे; मात्र तरीही परिवार, मित्र, समाज, दानशूर व्यक्तींनी मदत केल्यास निराशेच्या गर्तेत सापडलेल्या व्यक्तींना सहज बाहेर काढता येईल.

हिंगोली शहरातील आत्महत्या

२०१९ - ७

२०२० -९

२०२१ - १

हिंगोली ग्रामीण उपविभागात ४५ आत्महत्या

हिंगोली ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांतर्गत हिंगोली ग्रामीण, औंढा नागनाथ, नर्सी नामदेव, सेनगाव, गोरेगाव ही पोलीस ठाणे येतात. या पाच पोलीस ठाणे हद्दीत २०२० मध्ये ३८ जणांनी आत्महत्या केल्या. तर २०२१ मध्ये मे पर्यंत ७ जणांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.

Web Title: 55 suicides during the Corona period; The need for emotional, financial support!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.