(Image Credit : HuffPost)
अलिकडे बदलत्या लाइफस्टाइलमुळे आणि खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयींमुळे अनेकांना वजन वाढण्याची समस्या होत आहे. वजन वाढल्यामुळे शरीराचा संपूर्ण आकाराच बेढब दिसायला लागतो. कंबर वाढलेली, पोट बाहेर आलेलं, पायांवर चरबी कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयत्न करतात. पण मुळात प्रत्येकाचं वजन वाढण्याचं वेगळं कारण असू शकतं. त्यामुळे त्यानुसारच उपचार करणं फायदेशीर ठरतं. त्यासाठी आधी कारण जाणून घेतलं पाहिजे.
शरीरावर पोट आणि कंबरेच्या आजूबाजूला चरबी जमा झाल्याने शरीर फारच विचित्र दिसतं. तसेच वेगवेगळे आजारही यामुळे होतात. मात्र जर तुम्ही योग्य डाएट घेतली आणि नियमितपणे एक्सरसाइज केली तर ही चरबी कमी केली जाऊ शकते. काही लोक या गोष्टी करतातही पण त्यांना वजन कमी करण्यात यश येत नाही. पण वजन वाढायला जेवढा कमी वेळ लागतो तेवढा जास्त वेळ वजन कमी करायला लागतो. काही टिप्स फॉलो केल्यास तुम्हाला मदत नक्कीच होईल.
संतुलित आहार
लाइफ स्टाइल बदलल्यामुळे लोक आता काहीही खाऊ लागले आहेत. खासकरून बाहेर खाण्याची सवय लोकांना लागली आहे. त्यामुळे अर्थातच वजन वाढणार. अशात अनियमित लाइफस्टाइल आणि असंतुलित आहारात बदल करायला हवेत. हे शरीराला अस्वस्थ करण्यासोबतच वजनही वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे शरीर फिट ठेवण्यासाठी संतुलित आणि योग्य आहार महत्त्वाचा ठरतो. काय आहार घ्यावा याचा सल्ला तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
पॅकेटमधील ज्यूसऐवजी ताजा ज्यूस
अलिकडे ज्यूसचे पॅकेटही बाजारात मिळू लागले आहेत. लोकांना हे सोपं वाटतं म्हणूण ते सुद्धा याची खरेदी करतात. लहान मुलांसोबतच मोठेही पॅकेटमधील ज्यूसचं सेवन करतात. पण हे पॅकेटमधील ज्यूस खासकरून सकाळी सेवन केल्यास नुकसानकारक ठरतात. पॅकेटमधील ज्यूस हे ना नैसर्गिक असतात ना शुगर फ्री. यात भरपूर प्रमाणात शुगर असते, त्यामुळे तुमचं वजन अधिक वाढतं.
सोशल मीडियाची नशा
आज सगळे लोक फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम इत्यादी सोशल प्लॅटफॉर्मवर सतत बिझी असतात. ना त्यांना खाण्याची आठवण राहत ना वेळेवर झोपण्याची. शारीरिक हालचाल तर जशी बंदच झाली आहे. प्रत्येकाला आपली सगळी कामे बसल्या जागेवरून टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करण्याची सवय लागली आहे. लोक आळशी झाले आहेत. त्यामुळे पोटावरील चरबी आपोआप वाढते. सोशल मीडियामुळे शारीरिक हालचाल कमी झाली आहे. याने पोटात चरबी जमा होऊ लागते आणि पोट बाहेर येऊ लागतं.
भाज्या कमी खाणे
भाज्यांचं सेवन आरोग्यासाठी हेल्दी असतं. जे लोक मांसाहारी आहे किंवा शाकाहारी आहेत, त्यांनी सर्वांनी डाएटमध्ये भरपूर प्रमाणात भाज्यांचं सेवन केलं पाहिजे. कारण यातून भरपूर प्रमाणात पोषक तत्त्व मिळतात. तसेच याने पचनक्रिया सुरळीत होते. ज्यामुळे पोटावर चरबी कमी होते.
प्रोबायोटिक्सची कमतरता
प्रोबायोटिक्समध्ये चांगले बॅक्टेरिया असतात. या बॅक्टेरियामुळे पचनक्रिया मजबूत होते. त्यामुळे दूघ, दहीसारख्या प्रोबायोटिक्स पदार्थांचं सेवन करावं. यातील पोषक तत्त्वांमुळे घर्लीन नावाच्या हंगर हार्मोनला नियंत्रित करण्यास मदत करतात. ज्यामुळे पोटावर चरबी जमा होत नाही.
पुन्हा पुन्हा भूक लागणे
अनेकदा जास्त खूश असल्याने किंवा तणावात असताना काही लोक अधिक खातात. कारण यादरम्यान तसे हार्मोन्स शरीरात रिलीज होतात. ज्यामुळे भूक वाढते. यामुळे अनेकांना पुन्हा पुन्हा भूक लागते. सतत खात राहिल्याने अर्थातच वजन वाढण्याचा अधिक धोका तयार होतो.