Hello Doctor: पुनर्वसन स्त्री आरोग्याचे; कोविडग्रस्त महिलांना तपासल्यावर 'या' गोष्टी लक्षात आल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 01:42 AM2020-10-11T01:42:44+5:302020-10-11T01:43:06+5:30

Women Health News: स्त्रियांबाबतीत या आजाराचे बरे होण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक जास्त आहे, असा एक संशोधनात्मक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. तरीही रुग्णालयात कोविडग्रस्त महिलांना तपासल्यावर पुढील गोष्टी लक्षात आल्या.

Hello Doctor: Rehabilitation Women's Health | Hello Doctor: पुनर्वसन स्त्री आरोग्याचे; कोविडग्रस्त महिलांना तपासल्यावर 'या' गोष्टी लक्षात आल्या

Hello Doctor: पुनर्वसन स्त्री आरोग्याचे; कोविडग्रस्त महिलांना तपासल्यावर 'या' गोष्टी लक्षात आल्या

googlenewsNext

डॉ. मधुरा उदय कुलकर्णी

कोविड-१९ नावाच्या आजाराने जगभर दहशत पसरवली आहे. विशेषत: स्त्रियांना हा आजार झाल्यावर मन-शरीर, भावना साऱ्याच आरोग्याची, सहनशक्तीची परीक्षाच बघितली जाते आणि मग एकदाचे सारे सोपस्कार पार पडल्यावर पुढे काय, हा मोठाच यक्षप्रश्न उभा राहतो. स्त्रियांबाबतीत या आजाराचे बरे होण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक जास्त आहे, असा एक संशोधनात्मक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. तरीही रुग्णालयात कोविडग्रस्त महिलांना तपासल्यावर पुढील गोष्टी लक्षात आल्या.

आजारानंतरचे काही दिवस जाणवणारी लक्षणे
अशक्तपणा / थकवा/ काम
करण्याचा उत्साह कमी होणे
पोटऱ्यांमध्ये गोळे येणे
कंबरदुखी / हात - पाय दुखणे
चक्कर येणे, थोडे काम केल्यावर धाप
एकाग्रतेचा अभाव / विसरायला होणे
बोलताना उसका लागणे / कोरडा खोकला
पचनशक्ती कमी होणे
वजन कमी होणे / क्वचित वाढणे
हॉर्माेन्सचे असंतुलन
अकारण धडधड, चीडचीड इत्यादी
भावनिक असमतोलाची लक्षणे

(या प्रकारची लक्षणे निर्माण होण्याची कारणे) - वैद्यकीयदृष्ट्या महिलांना या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर अल्प, मध्यम, गंभीर स्वरूपाची व्याधी निर्माण होते. सर्वसाधारणपणे १०-१२ दिवसांत आजाराची बाधा होऊन त्रास हळूहळू कमी होतो. सर्वसाधारणपणे १८ दिवसांनंतर आजाराचे प्रमाण कमी झाल्यावर पुनर्वसनाचा टप्पा पुढे येतो. शारीरिक त्रासांच्या कारणांना पाहता औषधाचे दुष्परिणाम, विषाणूचे संक्रमण इत्यादीमुळे मांसपेशीतील सूज, दुखणे उद्भवते. विविध पोषकांशांच्या, जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे काही लक्षणे निर्माण होतात.
आथिक समस्या, एकटेपणा, सामाजिक संपर्काचा अभाव, मनाचा कमकुवतपणा यामुळे अनेक मानसिक लक्षणे उद्भवतात.
लोह, कॅल्शियम इत्यादीच्या कमतरतेमुळे, कदाचित रुग्णालयातील क्वारंटाइन सेंटरमधील वातावरणामुळे, आजाराच्या दहशतीमुळे भावनिक अस्थिरता व त्यातून भावनात्मक बदल व त्रास दिसून येतात. आर्थिक असाहाय्यता - नोकरी - धंद्यावर अनुपस्थिती व दुर्लक्ष, वैद्यकीय खर्च यामुळे अर्थिक संकट उभे ठाकण्याची शक्यता तयार होते.

पुनर्वसन सर्वांगीण आरोग्याचे
वैद्यकीय सल्ला व तपासण्यांचे महत्त्व निर्विवाद आहे; म्हणूनच आजारानंतरही डॉक्टरांना नियमित भेटणे गरजेचे आहे.
समुपदेशन व मानसिक आरोग्यासाठी योग्य ती मदत गरजेची असेल तर त्याचाही अवलंब करावा.
स्वमदत तंत्र व नियोजनाची क्रमवार यादी- बºयाच स्त्रियांना स्वयंपाक करू की नको, माझ्या कुटुंबीयांना माझ्यामुळे संसर्ग तर होणार नाही ना?
मला पुन्हा आजार होऊ शकतो का? अशा अनेक शंकांनी ग्रासलेले असते. त्यांच्यासाठी तर हे पुनर्वसन टप्पे खूप महत्त्वाचे आहेत -
स्वीकार - पुन्हा काम करण्याचा आत्मविश्वास पावला-पावलांनी येईल. पुन्हा नव्याने सुरुवात करताना काही दिवस जातील, त्यासाठी मनाची तयारी करावी.
गैरसमज योग्य शास्त्रीय ज्ञानाने दूर करावेत. सर्वसाधारपणे संसर्ग झाल्यावर १० दिवसांनंतर आपल्यापासून दुसºयांना त्रास होण्याची शक्यता कमी होते.
हात स्वच्छ धुण्याची सवय ठेवा. मास्कचा वापर घरात वावरतानाही करावा. योग्य तेव्हा ग्लोव्हज् वापरा.
योगसाधना, प्राणायाम, ध्यानाचा सराव, दीर्घ श्वसन, माफक व्यायाम याचा दैनंदिन जीवनशैलीत समावेश करावा.
धूपन-घरामध्ये वेगवेगळ्या औषधींनी धूप करावा. (गुगुळ, अगरू, धूप इ. साहाय्याने.)

खाण्या-पिण्याच्या सवयीतील बदल.
सामाजिक जीवन हळूहळू सुरळीत करण्याचा प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यानुसार काम सुरू करावे, आर्थिक पुनर्वसन होईलच.
प्रत्येक अडचण ही काहीतरी नवीन बदलांची सुसंधी असते. आलेल्या या व्यतयांना, थांबलेल्या क्षणांना मनातील सकारात्मक विचारांच्या परीसस्पर्शाने सोन्याची झळाळी नक्कीच आणता येईल.

हे टाळा
ब्रेड / बेकरीचे पदार्थ
लोणचे, पापड, तळलेले
मसालेदार पदार्थ
शिळे, फ्रिझमधले आंबवलेले पदार्थ
बाजारातून आणलेले कृृत्रिम
रंगद्रव्ययुक्त पदार्थ.
याचा वापर करा

मूठभर काळ्या मनुका पाण्यात भिजवून चावून खाणे. डाळिंब, खजूर, कोकम, खडीसाखर, साळीच्या लाह्या, लाल भोपळा, भाजलेले साठे, साळीचे तांदूळ, गहू-नाचणीचे सत्त्व, मूग-मटकी उसळी, सालीसकट डाळी, पोहे, राजगिरा, गूळ, शिंगाडे, जरदाळू, सुके अंजीर, ज्येष्ठमध + दूध, बेदाणे, साजूक तूप, भाज्यांचे सूप, तांदळाची पेज, सातू इ. पदार्थ जेवणात असावेत. विशेषत: स्त्रियांबाबतीत मानसिक, भावनिक तणावाचा परिणाम शरीरस्थ हार्मोन्सवर होऊन मासिक पाळीसंबंधी तक्रारी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याचा विशेष विचार व्हावा, तसेच घरातील स्त्रीचा कुटुंब, समाज आरोग्यावरही प्रभाव असतो. त्यामुळे स्त्री अरोग्याला महत्त्व देणे व कोरोनाबाधेनंतर पुनर्वसनाचे नियोजन करणे अपरिहार्य आहे.

(लेखिका एम.डी.स्त्रीरोग-प्रसूती तज्ज्ञ आहेत.)

Web Title: Hello Doctor: Rehabilitation Women's Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.