‘भाज्या घ्या मुखी, आरोग्य ठेवा सुखी’; जाणून घ्या आयुर्वेदशास्त्रानुसार 'या' भाज्यांचे गुणधर्म

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 01:04 AM2020-06-28T01:04:34+5:302020-06-28T01:04:47+5:30

‘हिरवा भाजीपाला खावा रोज, राहील निरोगी आरोग्याची मौज’, ‘भाजीपाल्याचे महत्त्व, स्वस्तात मिळेल भरपूर सत्त्व...’

‘Eat vegetables, keep health, be happy’; Learn the properties of 'these' vegetables according to Ayurveda | ‘भाज्या घ्या मुखी, आरोग्य ठेवा सुखी’; जाणून घ्या आयुर्वेदशास्त्रानुसार 'या' भाज्यांचे गुणधर्म

‘भाज्या घ्या मुखी, आरोग्य ठेवा सुखी’; जाणून घ्या आयुर्वेदशास्त्रानुसार 'या' भाज्यांचे गुणधर्म

googlenewsNext

डॉ. अंकुश जाधव

जागतिक महासाथ असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी चांगला आहार महत्त्वाचा आहे. कोरोना व त्यात आता पावसाळा. पावसाळ्यात सूर्यकिरणं प्रखर नसल्याने रोग होण्याची शक्यता अधिक असते. भूक न लागणे, सर्दी, पडसे, खोकला, ताप, आम्लपित्त, जुलाब होणे, मलेरिया, डेंग्यू यासारखे आजार या काळात अधिक होतात. पावसाळ्यात मोजके आणि कमी खावे. पचायला हलका आहार घ्यावा. खाण्याचे पदार्थ स्वच्छ, ताजे व गरम असावेत. आहारात मिरी, सुंठ, आले, हिंग, कांदा, लसूण यासारख्या पदार्थांचा वापर अधिक करावा. फळभाज्या का खाव्यात, त्याचे उत्तर सुरुवातीच्या म्हणीत आहे. पावसाळ्यात कोणत्या फळ व पालेभाज्या खाल्ल्याने आरोग्य उत्तम राहते, ते येथे सांगितले आहे.

आपण जो दररोज आहार घेत असतो, त्या आहारातूनच आपल्या शरीरास आवश्यक असणारी पोषक तत्त्वे मिळत असतात. त्यातून आपली रोगप्रतिकारकशक्ती (इम्यून सिस्टीम) मजबूत होते. आजच्या विज्ञानानुसार रोगप्रतिकारशक्ती चांगली राखण्यासाठी प्रथिनांची (प्रोटिन्स) आवश्यकता असते. मानवी शरीरासाठी दैनंदिन आहारातून प्रत्येक किलोमागे एक ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते. शरीर प्रथिने साठवून ठेवत नाही. त्यामुळे ते दररोज घ्यावे लागतात. या सर्व भाज्या शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याचे कार्य करतात.

आयुर्वेदशास्त्रानुसार या भाज्यांचे गुणधर्म

  • मेथी : वात व कफ दोषनाशक आहे. भुकेची इच्छा न होणे, मधुमेह, आमवात, ताप, स्थौल्य, सूज, वारंवार जुलाब होणे यात मेथीचा उपयोग होतो. मेथी मातेचे दूध वाढविणारी आहे. मेथीचे लाडू बाळंतपणानंतर खावेत.
  • माठ : हिचे पांढरा, तांबडा व काटेरी असे तीन प्रकार असून चवीला तुरट आहे. माठ रक्तशुद्धीकर आहे. हिचा पित्तरोग रक्त व त्वचारोग, चक्कर येणे यांत चांगला उपयोग होतो.
  • वांगे : वांग्याविषयी बराच मोठा गैरसमज आहे, तो म्हणजे वातुळ आहे. वास्तविक वांग्याने वातदोष वाढत नसून उलट दोषांचे शमन करते. पांढरे वांगे मूळव्याधनाशक आहे.
  • पालक : ही थोडी पचायला जड असली, तरी मलप्रवृत्ती साफ करणारी आहे. नेहमी खाण्यास योग्य आहे. रक्त वाढविणारी भाजी म्हणून प्रसिद्ध आहे. लोहाचे प्रमाण भरपूर आहे.
  • चाकवत : ही वात, पित्त व कफ या तिन्ही दोषांचे शमन करते. ही मूळव्याध, त्वचारोग, पोटाचे विकार यासाठी चांगली असून रक्त वाढविणारी आहे. लोहाचे प्रमाण भरपूर आहे.
  • तांबडा भोपळा : शरीर बारीक असणे, लघवी साफ न होणे, सर्वांगाची आग होणे, त्वचाविकार यात उपयोगी ठरते. ज्यांना जाड व्हायचे आहे, त्यांनी दोन्ही भोपळ्यांच्या भाज्या खाव्यात.
  • कांदा : सुका खोकला, रक्तपित्त, हृदय अशक्त असणे, लघवीला अडखळत होणे, शुक्राणूंची संख्या कमी असणे, संभोगाची इच्छा कमी होणे, मासिकपाळीच्या वेळी पोटात दुखणे, संधिवात, कावीळ, सूज, मूळव्याध इ. अनेक आजारांत कांद्याचा उपयोग होतो. जखमेवर याचा लेप करतात. जखम बरी होण्यास मदत होते. मुकामार लागून येणाऱ्या सुजेवर लेप करतात. फिट आली तर कांदा फोडून नाकाजवळ धरतात.
  • पडवळ : पचायला हलका, चवीला काहीसा कडू असून तिन्ही दोषकारक आहे. अजीर्ण, वारंवार तहान लागणे, पोटात जंत होणे, सूज येणे, अशक्तपणा यावर उपयोगी ठरतो. याने शौचास साफ होण्यास मदत होते.
  • तोंडली : पचायला हलकी व दोषशामक आहे. हिचा जखमेवर लेप केल्यास सूज व वेदना कमी होतात. यकृतविकार, कावीळ, रक्तविकार, खोकला, दमा, मधुमेह या आजारांवर उपयोगी ठरते. परंतु, नेहमी खाऊ नये.
  • दोडका : गाठी होणे, रक्त व त्वचारोग, प्लीहा व यकृत या अवयवांना सूज येणे, खोकला व दमा या आजारांवर उपयोगी.
  • मुळा : कोवळा मुळा पचायला हलका असतो. मूतखडा असलेल्यांनी कोवळा मुळा अवश्य खावा. मासिकपाळीच्या वेळी योग्य प्रमाणात स्राव न होणे, यासाठी उपयोगी आहे. भाज्या फार बारीक चिरू नयेत.
  • कारले : पचायला हलके, चवीला कडू असून तिन्ही दोषांचे शमन करणारे आहे. हे जखमांची शुद्धी करणारे व जखमा भरून येण्यास मदत करणारे आहे. याचा यकृतविकार, स्वादुपिंडाचे आजार, आमदोष, मूळव्याध, त्वचाविकार, स्थौल्य, विषबाधा इ. आजारांवर उपयोगी. योन, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. म्हणून, मधुमेही रुग्णांत विशेष उपयोगी.

 

 

Web Title: ‘Eat vegetables, keep health, be happy’; Learn the properties of 'these' vegetables according to Ayurveda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.