लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : माहेरून पाच लाख रुपये आण अन्यथा तुला माझ्या घरात राहू देणार नाही, असे म्हणत सासूरवाडीत विवाहितेचा छळ केला जात असल्याचे प्रकरण उघडकीस आले. सन २०१७पासून हा प्रकार सुरू असून, या घटनेसंदर्भात गोरेगाव पोलिसात सोमवारी (दि. २४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरेगाव तालुक्यातील ग्राम पाथरी येथे माहेर असलेली यास्मिन सादिक शेख (२७, रा. कोपे-चुलोद, ता. लालबर्रा, जि. बालाघाट -मध्य प्रदेश) हिचे लग्न ३० एप्रिल २०१७ रोजी सादिक शेख (३२) सोबत झाले होते. पती सादिक शेख हा तिला माहेरून हुंड्याच्या स्वरुपात पाच लाख रुपये आण, अशी मागणी करीत मारहाण व शिवीगाळ करीत असे. सासू जोहरा जमशेर शेख, भासरा आशिक जमशेर शेख (३५) व जाऊ शबनम आशिक शेख (२८) हे यास्मिनला पागल आहे, असे म्हणून नेहमी त्रास देत होते. या विषयाला घेऊन २६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाथरी येथे तंटामुक्त गाव समितीची सभा घेण्यात आली असता सादिकने पंचांसमक्ष यास्मिनच्या वडिलांना मी तुमच्या मुलीला दवाखान्यात पैसे लावले, त्याचे पाच लाख रुपये द्या, तरच मी तुमच्या मुलीला घेऊन जाईन, असे सांगितले. त्यांचे प्रकरण भरोसा सेल येथे गेले होते. परंतु, भरोसा सेलमध्ये तडजोड न झाल्याने सादिक शेख, जोहरा जमशेर शेख (६०), आशिक शेख व शबनम शेख (सर्व रा. कोपे - चुलोद, ता. लालबर्रा, जि. बालाघाट मध्य प्रदेश) यांच्यावर गोरेगाव पोलिसात भान्यासं २०२३ कलम ८५, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...अन् तिचा नंबर ब्लॉकमध्ये टाकला७ नोव्हेंबर २०२४ रोजी यास्मिन शेख ही पतीसोबत गोंदिया येथे आली होती. उपचार करून तिला सादिकने ऑटोमध्ये बसवून पाथरी येथे पाठविले. मला काम आहे ते आटोपून पाथरी येथे परत येतो, असे सांगून तो निघून गेला व तिचा नंबर ब्लॉकमध्ये टाकला दुसऱ्या मोबाइलवरून यास्मिन यांनी फोन केले असता त्याने तुझ्या आई-वडिलांनी तुला दवाखान्यात पैसे लावले नाहीत व हुंड्याचेही पैसे दिले नाहीत. त्यामुळे मी तुला घेऊन जात नाही, मी इस्तेमाह कमिटी, भंडारा येथे अर्ज केला आहे, तिथून तुला पत्र येणार आहे, असे सांगून त्याने फोन कट केला होता.