गोंदिया : कोविड विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असून रुग्णांच्या मृत्यूंतही वाढ होत आहे. त्यामुळे शासनाने १ जूनपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. असे असतानाही या संचारबंदीत नागरिक बिनधास्तपणे सकाळी उठल्यावर फिरायला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉक आरोग्यासाठी की, कोरोना घरात आणण्यासाठी, असा प्रश्न पडला आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. संक्रमित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत याकडे दुर्लक्ष करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. या वेळी आपण सर्वांनी घरीच राहून आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले पाहिजे. नागरिकांनी कोणतेही नियम मोडू नयेत आणि सुरक्षित राहावे म्हणून जिल्हा प्रशासनाने निर्बंध जाहीर केले आहेत. म्हणजे या काळात सर्व अनावश्यक गोष्टींना बंदी घालण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व जिम बंद आहेत. अशा वेळी, प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न येत आहेत. यातीलच एक म्हणजे या काळात फिरायला जाणे किंवा जॉगिंग करणे सुरक्षित आहे काय? आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आजकाल फिरायला जाणे योग्य नाही. जर ते आपल्या आरोग्यासाठी अतिमहत्त्वाचे असेलच, तर आपण शारीरिक अंतराच्या नियमाचे अनुसरण करून चालण्यासाठी जाऊ शकता. हे आपल्याला सुरक्षित ठेवू शकते. याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
......
पोलिसांकडूनही सूट
१) सकाळी फिरायला येतानाही एकटे येत नाही तर सोबत दोन-चार मित्र असतात. फिरताना आणि फिरून आल्यावर महिलांच्या विश्रांतीसाठी तासभर गप्पागोष्टी पुन्हा सुरूच असतात. पोलीस यंत्रणा या भ्रमंती करणाऱ्यांना थांबवित नसल्याने मनमोकळेपणाने हा कारभार सुरू आहे.
२) पहिल्या लाटेत बाहेर फिरायला निघालेल्या लोकांवर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई केली होती. परंतु दुसऱ्या लाटेच्या वेळी भ्रमंतीसाठी निघालेल्या नागरिकांवर कारवाई झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसले नाही.
३) आपण बाहेर फिरायला जात असाल तर कसरत करताना कशालाही स्पर्श करू नका. याशिवाय नेहमीच रिकाम्या जागेवर चाला किंवा व्यायाम करा. जेथे जास्त गर्दी नसेल अशाच ठिकाणी जावे. डॉक्टरांच्या मते, शारीरिक अंतर ६ फूट ठेवावे.
४) आपण बाहेर फिरायला जात असाल तर पार्कचे गेट व झाडे आदी गोष्टींना थेट स्पर्श करू नका. याव्यतिरिक्त जर आपण हाताने कुठेही स्पर्श केला असेल तर लगेचच अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर वापरा. या सर्व बाबींकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संसर्गाचा धोका जास्त प्रमाणात निर्माण होईल.
..................
खुली हवा नव्हे; कोरोना विषाणू
कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. जिम आणि इतर ठिकाणी जाणे बंद करूनही सकाळी आणि सायंकाळी फिरायला जाण्याची मनाई केली आहे. मात्र शहरात अनेक मोकळ्या मैदानांत महिला-पुरुष मॉर्निंग वॉकसाठी येतात. सायंकाळी फिरायला येतात. यात वृद्धांपासून तर तरुणांचाही समावेश आहे. शुद्ध हवा घेण्याच्या नावावर घरात कोरोना तर घेऊन जात नाही ना? याकडेही त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
..........
कोरोनाची भीती वाटत नाही का?
प्रत्येकाला कोरोनाची भीती वाटते. आरोग्य सुदृढ राहावे यासाठी चालणे आवश्यक आहे. नियमांचे पालन व कोरोनापासून दूर राहावे यासाठी आपण सकाळी चालत असतो. घरात राहून-राहून कंटाळा आला आहे. तब्येतीला जपण्यासाठीच आपण चालत आहोत.
- भरतराम हुकरे, नागरिक
..................
मागील अनेक वर्षांपासून दररोज फिरायला जात आहे. ‘सुबह की हवा और लाखो रुपये की दवा एक जैसी है’ म्हणून दररोज फिरणे महत्त्वाचे आहे. घरात राहून-राहून आम्ही कंटाळलो. आता सकाळ-सायंकाळ फिरून आपल्या तब्येतीची काळजी घेत आहोत.
नामदेव तावाडे, नागरिक.