तिरोडा : गोंदिया जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या तिरोडा शहराचा आणि या परिसरातील लगतच्या गावांचा आता दिवसेंदिवस चांगलाच कायापालट होत आहे. जवळच असलेल्या नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पाला भेट देणारे पर्यटक आणि येथील अदानी प्रकल्पाच्या निमित्ताने वाढलेली वर्दळ यामुळे येथे स्वयंरोजगाराला चालना मिळत असून नागरिकांच्या राहणीमानातही बराच फरक पडल्याचे दिसून येत आहे.औद्योगिक विकासापासून दूर असलेल्या गोंदिया जिल्ह्याला राज्यातील सर्वात जास्त क्षमतेच्या (३३०० मेगावॅट) अदानी वीज प्रकल्पाने नवीन ओळख दिली. त्यामुळे तिरोडा शहराचा परिसर झपाट्याने विकसित होण्याच्या मार्गावर लागला आहे. तिरोड्यालगतच्या काचेवानी, बरबसपुरा, मेहंदीपूर या गावांचे पुनर्वसन करण्यात आल्यानंतर नव्या ठिकाणी त्या गावकऱ्यांना विविध प्रकारच्या सोयीसुविधा मिळाल्याने हे गावकरीही खुश असल्याचे दिसून येते. याशिवाय अदानी फाऊंडेशनकडून या गावांमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना विविध सोयीसुविधा मिळण्यासोबत अनेक नागरिकांना स्वयंरोजगार उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पासाठी परप्रांतातून आलेल्या कर्मचारी व कामगार वर्गाच्या विविध गरजा भागविताना येथील नागरिकांना उत्पन्नाची नवी साधनं उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे परंपरागत शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे राहणीमान सुधारले आहे.केवळ वीज प्रकल्पच नाही तर व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळालेल्या नागझिरा-नवेगावच्या जंगलात भ्रमंतीसाठी येणाऱ्या राज्यातील आणि राज्याबाहेरील पर्यटकांसाठी जवळचे शहर तिरोडाच आहे. त्यामुळे येथे आता चांगल्या हॉटेलांची भर पडत असल्याचे अलिकडच्या काळात दिसून येत आहे. याशिवाय शॉपिंग मॉल, सुपर मार्केटसारखी संकल्पना येथे प्रत्यक्षात उतरत असल्यामुळे तिरोडा परि सरात पुढील दोन-तीन वर्षात आमूलाग्र बदल झाल्याचे चित्र दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिरोडा शहरापासून काही अंतरावर गोंदिया मार्गावर असलेल्या काचेवानीजवळ अदानी प्रकल्पाच्या कर्मचारी वसाहतीचे काम अंतिम टप्प्यात असल्याने या भागात आणखीच वर्दळ वाढली आहे. या वसाहतीत अत्याधुनिक सोई-सुविधांसह सुसज्ज रुग्णालय व इतर सुविधा असल्यामुळे त्याचा लाभ अनेकांना होणार आहे.
तिरोडा परिसरातील अनेक गावांचा होतोय कायापालट
By admin | Updated: September 15, 2014 00:13 IST