लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्ह्यात मे महिन्यात अचानकपणे आलेल्या वादळी वाऱ्याने शेती आणि शेतकऱ्यांच्या उपकरणांना मोठा फटका बसला आहे. विशेषत सौर कृषी पंपाच्या सोलर पॅनल्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उंचावर बसवलेली ही पॅनल्स संरक्षक फ्रेमसकट उन्मळून पडल्याच्या घटना ग्रामीण भागात घडल्या आहेत. परिणामी, सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या या सौर पंपांची कार्यक्षमता पूर्णता ठप्प झाली आहे.
जिल्ह्यातील शेतकरी वर्ग पारंपरिक विजेवरील अवलंबन कमी करण्यासाठी सौर कृषी पंप स्विकारत आहे. शासनाच्या विविध योजनांमुळे शेतीसाठी सौरऊर्जेचा वापर वाढला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी सौरपंप बसवून सिंचनाचा पर्याय निवडत आहेत. वीज बचती बरोबरच खर्चातही बचत होत असल्याने ही यंत्रणा लोकप्रिय ठरली आहे. 'मागेल त्याला सौर कृषी पंप' ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांनी महावितरणकडे प्रस्ताव सादर केले आहेत. त्याचबरोबर प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गतही हजारो सौर पंप कार्यान्वित करण्यात आले आहेत.
पॅनल उन्मळले; नुकसान भरपाई मिळेल का?सौर पंप व पॅनल्स हे अनुदानित असले तरी त्यांचा विमा सर्वसामान्यतः योजना अर्टीमध्ये समाविष्ट नसतो. जर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असेल, तर पाच वर्षे संबंधित कंपनी दुरुस्ती करून देते. त्यासाठी योग्य प्रकारे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आता अर्ज करणे सुरू आहे.
सोलर पॅनलजवळ वीज प्रतिरोधक आवश्यकसौर पॅनलला वीज साठवणुकीसाठी यंत्रणा जोडलेली असते. वादळ आणि वीज चमकण्याच्यावेळी या उपकरणांमध्ये शॉर्टसर्किट किंवा आग लागण्याचा धोका संभवतो. त्यामुळे पॅनलजवळ योग्य प्रकारचा वीज प्रतिरोधक बसवणे अत्यावश्यक आहे. अनेक वेळा पुरवठादार कंपनी ही व्यवस्था योग्य प्रकारे देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बसवलेल्या यंत्रणेचे तांत्रिक मूल्यांकन करून घ्यावे.
वादळांचा सोलर पॅनल्सला तडाखासौर पॅनल्स प्रामुख्याने उंच असतात. त्यामुळे वादळाचा जोर अधिक असलेल्या भागात हे पॅनल्स उन्मळून पडण्याचा धोका संभवतो. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे पॅनल्स तुटून जमिनीवर आपटल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे संपूर्ण सौरपंप प्रणालीचे नुकसान झाले असून, यंत्रणेचे दैनंदिन कार्य बंद पडले आहे.