५८३ गावांत भेडसावणार पाणीटंचाईची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:33 AM2021-03-01T04:33:33+5:302021-03-01T04:33:33+5:30

गोंदिया : मागील वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी आणि सिंचन प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणी साठा असला तरी यंदा ...

The problem of water scarcity will be faced in 583 villages | ५८३ गावांत भेडसावणार पाणीटंचाईची समस्या

५८३ गावांत भेडसावणार पाणीटंचाईची समस्या

googlenewsNext

गोंदिया : मागील वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी आणि सिंचन प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणी साठा असला तरी यंदा एप्रिल ते जून महिन्यात जिल्ह्यातील ५८३ गावांतील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या भूवैज्ञानिकांनी निरीक्षण विहिरींवरून ही बाब पुढे आली आहे.

ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे दरवर्षी तीन टप्प्यांत जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आराखडा तयार केला जातो. यांतर्गत भूवैज्ञानिक जिल्ह्यात निश्चित केलेल्या निरीक्षण विहिरीची पाणी पातळी मोजून हा आराखडा तयार करीत असतात. २४ फेब्रुवारीला तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार जिल्ह्यातील ५८३ गावांमध्ये एप्रिल ते जून महिन्यादरम्यान पाणीटंचाईची समस्या निर्माण होणार आहे. यात ४४२ मोठी गावे, तर १३१ लहान गावांचा समावेश आहे. संभाव्य पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने १६४७ उपाययोजनांचा आराखडा तयार केला असून त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे.

......

या करणार उपाययोजना

पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी २२३ बोअरवेलचे खोदकाम, ११९६ बोअरवेलची दुरुस्ती, १४६ विहिरींमधील गाळाचा उपसा करण्यात येणार आहे. तसेच ७६ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तर सहा खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

......

मार्चनंतर पाणीटंचाईच्या समस्येत होणार वाढ

जिल्ह्यात मार्च महिन्यापर्यंत पाणीटंचाईची फारशी समस्या जाणवणार नाही. मात्र, एप्रिल ते जूनदरम्यान काही गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या अधिक बिकट हाेऊ शकते. त्यामुळे या गावांमध्ये उपाययोजना करणे आवश्यक आहे.

.......

असा तयार केला जातो पाणीटंचाईचा आराखडा

जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठाअंतर्गत दरवर्षी तीन टप्प्यांत पाणीटंचाईचा आराखडा तयार केला जातो. त्यात ऑक्टोबर ते डिसेंबर पहिला टप्पा, जानेवारी ते मार्च दुसरा टप्पा आणि एप्रिल ते जून तिसरा टप्पा, असा आराखडा तयार केला जात असल्याचे भू-वैज्ञानिक शिरीष बागडे यांनी सांगितले.

Web Title: The problem of water scarcity will be faced in 583 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.