अर्जुनी मोरगाव : नुकत्याच सरपंचपदाच्या झालेल्या आरक्षणसोडतीत धाबेटकडी ग्रामपंचायतीमध्ये सतत अनुसूचित जमातीवर अन्याय झाल्याने येथील देवाजी कुंभरे यांनी आरक्षणावर हरकत घेतली आहे. प्रशासनाने दखल घेऊन आरक्षण बदलाची मागणी त्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
सरपंचपदासाठी आरक्षण सोडत गुरुवारी (दि.२८) काढण्यात आली. यात २००५ पासून प्रत्येक ग्रामपंचायतीचा सरपंचपदाचा आरक्षण गोषवारा तयार करण्यात आला. त्यानुसार, २०२० ते २०२५ या कालावधीसाठी सरपंचांचे आरक्षण ठरविण्यात आले. धाबेटकडी ग्रामपंचायतीमध्ये २००५ ते २०१० याकरिता अनुसूचित जमाती असल्याचे गोषवाऱ्यात दाखवले गेले. प्रत्यक्षात ते सर्वसाधारणकरिता राखीव होते. यामुळे २०१० ते २०१५, २०१५ ते २०२० आणि २०२० ते २०२५ करिता सतत चुका होत गेल्या. यामुळे अनुसूचित जमातीचे आरक्षण निघाले नाही. हा गोषवारा प्रशासनाकडून तयार करण्यात आला असून तो चुकीचा आहे. हा घोळ गोषवा-यातील चुकीमुळे झाला. यावर देवाजी कुंभरे यांनी आक्षेप घेतला असून तातडीने यात सुधारणा करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.