कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आता नियंत्रणात आली आहे. यामुळे शाळा सुरू करण्यास निर्माण झालेले वातावरण बघून राज्य शासनाने स्थानिक स्तरावर निर्णय घेऊन शाळा करण्यास परवानगी दिली. त्यानुसार, जिल्ह्यातही वर्ग ८ ते १२ पर्यंतच्या शाळा सुरू करण्यास शिक्षण विभागाने परवानगी दिल्याने आजघडीला जिल्ह्यातील ३७६ पैकी २७४ शाळांची घंटा वाजली आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये विद्यार्थीच कोरोना बाधित निघाल्याने शाळाच बंद करण्याची पाळी आली आहे. मात्र सुदैवाने जिल्ह्यात असा प्रकार घडलेला नाही. जिल्ह्यात सुरू झालेल्या २७४ शाळा सुरू झाल्यानंतर त्यातील एकही शाळा आतापर्यंत बंद करण्याची पाळी आलेली नाही.
विद्यार्थ्यांना मिळाले आपले मित्रमागील मार्च महिन्यापासून शाळा बंद असल्याने घरातच कोंडून रहावे लागत होते. मात्र आता शाळा सुरू झाल्याने आपल्या मित्रांना भेटता आले. नियमात राहून का होईना मात्र अभ्यासासोबतच आता मित्रांच्या भेटीगाठी तरी होत आहे.- अभिषेक वाघमारे (विदयार्थी)
शाळा सुरू झाल्याने आता घराबाहेर पडता येत आहे. नाहीतर मागील वर्षापासून घरातच रहावे लागत होते. आता अभ्यास ही होत असतानाच मित्रांसोबतही भेटता येत आहे. मात्र पालक अद्यापही शाळेत पाठविण्यास तयार नाही त्यामुळे अडचण होते. - विनोद तुरकीवार (विद्यार्थी)
मागील वर्षापासून शाळा बंद असल्याने मुले घरात कोंडून होतो. घरात राहून त्यांना कंटाळा आला होता. शिवाय ऑनलाईनमध्ये हवा तसा अभ्यास होत नव्हता. आता शाळा सुरू झाल्याने मुले अभ्यास करीत असून त्यांना घराबाहेरही पडता येत आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी अजुनही थोडा धोका कायम आहे. - देवीदास कोरटे (पालक)
सर्व शाळा सुरु- राज्य शासनाच्या आदेशानुसार पालकांची परवानगी घेऊन जिल्ह्यातील २७४ शाळा सुरू करण्यात आल्या असून त्यातील एकही शाळा बंद झाली नाही.- शाळा सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील २८९०० पालकांनी संमती दिली असून त्यानुसार शाळा सुरू आहेत. यात गोंदिया तालुक्यातील सर्वात शाळा सुरू असल्याचे दिसत आहे.- जिल्ह्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात असून आतापर्यंत एकही विद्यार्थी बाधित निघालेला नाही. त्यामुळे शाळा बंद करण्याची गरजच पडलेली नाही.