जिल्ह्यात कृषिपंप चोरटे झाले सक्रिय
पांढरी : सिंचनासाठी विहीर, नदीनाल्यावर लावलेले कृषिपंप चोरीस जाण्याच्या घटनांत जिल्ह्यात वाढ झाली आहे. दररोज कुठे ना कुठे चोरीची घटना घडत असून, एखादी टोळी जिल्ह्यात सक्रिय आहे.
विडी उद्योगास उतरती कळा
गोंदिया : जिल्ह्यात एकेकाळी मोठ्या उद्योगांना आव्हान देणाऱ्या विडी उद्योगास उतरती कळा लागली आहे. हे उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी कामगारांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे.
मजुरी वाढल्याने शेतकरी अडचणीत
गोरेगाव : जिल्ह्यात सध्या धान कापणी व मळणीला जोर आला आहे. त्यामुळे शेतकरी मजुरांच्या शोधात आहे. मात्र, मजुरी वाढविण्यात आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
किसान सन्मान योजनेपासून वंचित
गोंदिया : सरकारने कोरोना संकटकाळात दिलासा मिळावा, यासाठी किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला. या योजनेतून अनेक लाभ मिळाले.
बेरोजगारांच्या हाताला काम द्या
अर्जुनी-मोरगाव : तालुक्यात मोठ्या उद्योगाचा पत्ता नाही. त्यामुळे तालुक्यात बेरोजगारांची संख्या वाढत असून, स्थानिक युवकांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे.
उभ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता
देवरी : रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहत असल्याने अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अतिक्रमणाची समस्या वाढली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
रस्त्याच्या दुर्दशेने अपघातात वाढ
गोंदिया : तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांची दुर्दशा तर झालीच, मात्र त्यापेक्षा ग्रामीण भागातील गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवरून चालताना जीव मुठीतच घेऊन चालावे लागते. रस्ता दुरुस्ती मागणी आहे.
शहरातील रस्त्यावर जनावरांचा ठिय्या
तिरोडा : शहरातील रस्त्यावर मोकाट जनावरांचा ठिय्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे मात्र वाहतूक ठप्प होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. एखादा मोठा अपघात घडल्यावर कारवाई करणार काय? असा सवाल केला जात आहे.
रोजगार सेवकांना मानधन अत्यल्प
सालेकसा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी झटणारे रोजगार सेवक संकटात आहेत. लोकांच्या हाताला काम द्यावे म्हणून मनरेगांतर्गत काम उपलब्ध करून देण्यात त्यांची जबाबदारी आहे. पण त्यांना अल्प मानधनावर काम करावे लागत आहे.
ग्रामीण भागातील रस्ते डांबरीकरणाविना
गोंदिया : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते बांधकाम केले जाते. मात्र अनेक गावांना जोडणारे रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे. यावर्षीच्या पावसाने तर शहरी तसेच ग्रामीण रस्त्यांची वाट लागली आहे. रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी अनेकदा लाेकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांकडे करण्यात येते. मात्र रस्ता दुरुस्ती करण्यात टाळाटाळ केली जात आहे.
आरोग्य सेवेकडे लक्ष देण्याची मागणी
गोंदिया : ग्रामीण भागातील आरोग्यसेवक, कर्मचारी व केंद्रात नियुक्त शासकीय डॉक्टर मुख्यालयी राहत नसल्याने आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. रुग्णांना सुलभ व जलद सेवा देता यावी हा शासनाचा उदात्त हेतू आहे. मात्र असे जिल्ह्यात होताना दिसून येत नाही. परिणामी रुग्णांमध्ये प्रशासनाविरुध्द संताप आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष देत यात सुधारणा करण्याची गरज आहे.
मामा तलावाला अतिक्रमणाचा विळखा
गोंदिया : जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असून, शेतात जाण्यायेण्याचे मार्गही बंद झाले आहेत. अनेक तलावांचे आकारमान कमी होत असल्याने साठवण क्षमताही घटत आहे.
राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वर्दळ
देवरी : चौपदरीकरण झालेला राष्ट्रीय महामार्ग शहरातून गेला आहे. जवळपास दोन कि.मी. पर्यंतच्या महामार्गावर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान या मार्गावरून भरधाव वाहनांची वर्दळ सतत असते. रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे त्रास सहन करावा लागत आहे.
पुन्हा वाढला प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर
साखरीटोला : शहरासह जिल्ह्यात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, सगळीकडे प्लॅस्टिकचा कचरा दिसत असून, शासनाच्या आदेशाला तिलांजली मिळत आहे. प्रदूषणात होणारी वाढ थांबविण्यासाठी प्लॅस्टिक पिशव्या बंद करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला.
तंटामुक्त समितींचे तंट्यांकडे झाले दुर्लक्ष
सडक-अर्जुनी : शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. गाव तंटामुक्त होईपर्यंत समित्यांचा जोर होता. गाव तंटामुक्त झाले व बक्षिसांची रक्कम मिळाल्यानंतर समित्यांनी तंट्यांकडे दुर्लक्ष केले. गाव तंटामुक्त झाल्यास बक्षीस रकमेची गरज आहे.
प्रसाधनगृहाअभावी व्यापाऱ्यांची कुचंबणा
सौंदड : व्यापारी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या मोठ्या बाजारात प्रसाधनगृहाची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे, ग्राहक, व्यापाऱ्यांची कुचंबणा होत आहे. सातत्याने हा प्रश्न उपस्थित होत आहे.