लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : मार्च महिन्यात सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने २२ मार्चपासून सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केली. मागील जवळपास ३ महिन्यांपासूनच हीच स्थिती असल्याने जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सुध्दा पूर्णपणे शुकशुकाट आहे. कोरोनाचा प्रादुर्भावामुळे पर्यटकांनी सुध्दा या पर्यटन स्थळांकडे पाठ फिरविल्याने यावर अवलंबून असणाऱ्यांचा रोजगार बुडाला आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरण व प्रतापगड किल्ला व शिव मंदिर येथे कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे तालुक्यातील हे मोठे पर्यटन स्थळ पर्यटकांअभावी ओस पडले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नवेगाव-नागझिरा अभयारण्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या शुन्यावर आली आहे. तालुक्यातील या तिन्ही पर्यटन स्थळावर सर्वत्र शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानात हरिण, रानगवा, अस्वल, वाघ , पांढरा सांभर, नीलगाय, रानडुक्कर, रानकुत्री, बिबट, ससे, भेडकी, चौशिंगा, चितळ, घोरपड, मोर, लावा, गुंडुरलावा, रान कोंबडी, आदी प्राणी हमखास पाहयला मिळतात. अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुक्यात पसरलेला नवेगावबांध अभयारण्यात जाण्यासाठी बकी गेट, खोली गेट, जांभळी गेट, पितांबरटोला गेट आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र मांक सहावरून जाण्यासाठी कोहमारावरून ३ किमी. अंतरावरून बकी गेट ही फार सोयीचे आहे. रायपूर, गोंदिया, नागपूरकडून येणाऱ्या पर्यटकांसाठी फारच सोयीचा गेट ठरला आहे. नवेगाव अभयारण्यात जाण्यासाठी खोली, बकी, जांभळी व पितांबर टोला गेटची निर्मिती करण्यात आली आहे. चुटीया गेट मात्र बंद करण्यात आला आहे. या राष्ट्रीय उद्यानात नवेगावबांध तलावाचे क्षेत्रफळ ११ चौ. कि.मी आहे. अठराव्या शतकात कोलु उर्फ कवळू पाटील डोंगरवार यांनी हे पिण्याचे पाणी व सिंचनासाठी तलाव बांधले होते. सात पहाडांच्या मध्यभागी वसलेले हे तलाव पर्यटकांना भुरळ घालते. प्रशिक्षित मार्गदर्शकांसह या ठिकाणी, पर्यटन संकुलात पर्यटक निवासाची व्यवस्था केली आहे. उपहारगृह देखील आहेत. लागहट, संजय कुटी, युथ होस्टेल, विश्रामगृहाची व्यवस्था आहे. पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी चार चाकी वाहन भाडेतत्त्वावर मिळण्याची व्यवस्था येथे आहे. दरवर्षी मार्च ते मे जून महिन्यादरम्यान येथे पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावत होते. यामुळे यावर आधारित रोजगाराच्या संधी सुध्दा निर्माण झाल्या होत्या. मात्र मागील ३ महिन्यांपासून लॉकडाऊन असल्यामुळे पर्यटनस्थळांवर पूर्णपणे शुकशुकाट असून अनेकांचा रोजगार देखील बुडाला आहे.
लॉकडाऊनमुळे पर्यटकांची पर्यटनस्थळांकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरण व प्रतापगड किल्ला व शिव मंदिर येथे कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे तालुक्यातील हे मोठे पर्यटन स्थळ पर्यटकांअभावी ओस पडले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नवेगाव-नागझिरा अभयारण्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या शुन्यावर आली आहे.
लॉकडाऊनमुळे पर्यटकांची पर्यटनस्थळांकडे पाठ
ठळक मुद्दे३ महिन्यांपासून शुकशुकाट : रोजगारावर झाला परिणाम