इटखेडा येथे तणाव : आरोपीच्या अटकेसाठी गावकरी रस्त्यावरअर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील इटखेडा येथील ओमप्रकाश दशरथ लांजेवार (३७) यांचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह सोमवारी (दि.२६) सायंकाळी पुलाजवळ तरंगताना आढळला. या घटनेने इटखेड्याचा परिसर बुधवारी ढवळून निघाला. अनैतिक संबंधातून खून केल्याच्या आरोप करीत गावकऱ्यांनी पोलिसांना वेठीस धरले. यामुळे गावात दिवसभर तणावाचे वातावरण होते.सविस्तर वृत्त असे की, मृतक ओमप्रकाश लांजेवार रा.इटखेडा याचा मृतदेह २६ सप्टेंबरच्या सायंकाळी घाटी पळसगाव, झिरोच्या कालव्यावरील पूलाजवळ तरंगताना दिसला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी हा मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. डॉक्टरांनी ही आत्महत्या असल्याचे सांगितले. मात्र मृतकाचे मोठे भाऊ देवराम लांजेवार व गावकऱ्यांनी ही आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप केला आहे. पत्नी, तिचा प्रियकर व मृतकाचे सासरे यांनी मिळून ओमप्रकाशचा खून केल्याचा आरोप होत आहे. पत्नीने २५ सप्टेंबरच्या मध्यरात्री कारस्थान करून ओमप्रकाशला संपविले आणि नंतर मृतदेह जवळीलच कालव्यात फेकून दिला. दुसऱ्या दिवशी दुपारी दिडच्या सुमारास पत्नी दोन्ही मुलींना घेऊन माहेरी गेली, त्यानंतर गावातील एका व्यक्तीला ओमप्रकाश २५ तारखेपासून बेपत्ता असल्याची माहिती भ्रमणध्वनीवरुन देऊन त्याला शोधण्याची विनंती केली, अशी चर्चा गावात कुजबूज व चर्चा आहे. गावातीलच एका व्यक्तीसोबत असलेल्या संबंधातून हे कांड झाल्याचा आरोप करीत या प्रकारणाची तक्रार देण्यासाठी नातेवाईक पोलीस स्टेशनला गेले. मात्र पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. पोलिसांनी तक्रार न घेतल्यामुळे पोलीस प्रशासनाविरोधात नागरिकांनी नारेबाजी केली. प्रकरण दडपण्याची पोलिसांची भूमिका असल्याचा आरोप नागरिकांनी केला. ओमप्रकाशचा खून आहे. याचे पुरावे म्हणून खाटेवरील रक्ताने माखलेली चादर, खाटेवरील रक्ताचे थेंब, एका प्लास्टिक टफवरील रक्त, स्वयंपाक घरातील जमिनीवर असलेले काही रक्ताचे डाग दाखविले. सदर हत्या ही वरवंटा मारून झाली असावी असेही मत काहींनी व्यक्त केले. त्या ठिकाणी वरवंटाही आहे.संतप्त जमावाची ठाणेदार बंडगर यांनी समजून काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पराग भट, पीएसआय सूर्यवंशी ताफ्यासह हजर होते. (तालुका प्रतिनिधी)गावकऱ्यांचा पोलिसांना घेरावओमप्रकाशच्या मारेकऱ्यांना अटक करा तरच अंत्यसंस्कार करू अशी भूमिका नागरिकांनी घेतली. हजारोच्या संख्येत गावकऱ्यांनी पोलिसांचा घेराव केला. वृत्त लिहीपर्यंत सायंकाळी ६.३० वाजताही नागरिकांनी ठाण्यात एकच गर्दी केली होती. ठाणेदार नामदेव बंडगर, पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी लेखी तक्रार घेतल्यानंतर नागरिकांचे समाधान झाले. शवविच्छेदनानंतरही मृतदेह ट्रॅक्टरमध्येच ठेवण्यात आला. ग्रामीण रुग्णालयात झालेल्या शवविच्छेदनावर गावकऱ्यांमध्ये संभ्रम आहे, पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी केली आहे. यावेळी नागरिकांचा संपूर्ण रोष पोलीस प्रशासनावर दिसून येत होता. तक्रारकर्त्याची पोलिसांनी दिशाभूल केल्याचा आरोप होत आहे.
अनैतिक संबधातून खून?
By admin | Updated: September 28, 2016 01:05 IST