देवरी : तालुक्यातील ककोडी क्षेत्रातील मुरमाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तुंबडीकसा येथे १० जून रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यामुळे विद्युत तारांचे घर्षण होऊन त्याची ठिणगी घरावर पडल्याने लागलेल्या आगीत अरकरा यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले. यामुळे चार भावंडांचे कुटुंब उघड्यावर आले. तर या घटनेचा धसका घेतल्याने अरकरा यांच्या आईचे बुधवारी (दि.११) हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यामुळे अरकरा कुटुंबावर दुहेरी संकट कोसळले.
प्राप्त माहितीनुसार मुरमाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तुंबडीकसा येथे गिरधारी अरकरा, विनोद, रामू आणि मेसराम या चार भावांचे कुटुंब आईसह एकाच घरात राहत होते. अरकरा हे १० रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास शेजारच्या घरी बसलेले होते. दरम्यान अचानक सोसायट्याचा वारा सुरू झाल्याने घरावरून जाणाऱ्या विद्युत तारांचे एकमेकांना घर्षण होऊन आगीची ठिणगी अरकरा यांच्या घरावर पडली. वाऱ्यामुळे संपूर्ण घराला आग लागली. शेजारी व गावकऱ्यांना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी अरकरा यांच्या घराकडे धाव घेतली व आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. परंतु आग आटोक्यात येईपर्यंत चारही भावांचे संपूर्ण घर जळून राख झाले होते. आगीत पैसे, धान्य, कपडे, तांदूळ, शेतीकरिता घेतलेले बियाणे, महत्वपूर्ण दस्तऐवज पूर्णतः जळाले. तलाठी गायधने, कोतवाल कोटांगले, सरपंच रामदेव सौरी, पोलिस पाटील गुलाबदास हिरवाणी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा तयार करून शासनाला अहवाल पाठविला. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली. तरी आगीमुळे चार भावंडांचा घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अरकरा कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाने अरकरा कुटुंबीयास आर्थिक मदत करण्याची मागणी केली जात आहे.
घटनेच्या धसक्याने आईचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
घराला आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले. आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून राख झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात आता आपले कुटुंब सावरणार कसे अशी चिंता चारही भावडांची आई मानकुवर लतखोर अरकरा (६०) यांना सतावू लागली. तर घर जळाल्याचे दु:ख त्या सहन करु शकल्या नाही. यातच गुरुवारी (दि.११) त्यांचे हृदयविकाराचा धक्क्याने निधन झाले. त्यामुळे अरकरा कुटुंबीयांवर दुहेरी संकट कोसळले आहे.