नुकसानग्रस्त धान उत्पादकांना मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:31 AM2021-09-18T04:31:07+5:302021-09-18T04:31:07+5:30
नवेगावबांध : पुष्य नक्षत्रापासून ढगाळ वातावरण व पावसाची अधूनमधून रिमझिम सुरू आहे. या ढगाळ वातावरणामुळे पोषक वातावरणाअभावी गाद ...
नवेगावबांध : पुष्य नक्षत्रापासून ढगाळ वातावरण व पावसाची अधूनमधून रिमझिम सुरू आहे. या ढगाळ वातावरणामुळे पोषक वातावरणाअभावी गाद व इतर कीड रोगांचे आक्रमण भातपिकावर झाले आहे. त्यामुळे धान उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानीचे सर्वेक्षण करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
धान उत्पादनात होणारी घट पाहता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. संपूर्ण शेत शिवारात या खरीप हंगामात लावलेल्या जवळपास प्रत्येक धान पिकावर ९० टक्के गादमाशीचा प्रकोप आढळून येत आहे. याचा परीणाम सरळ उत्पादनावर होऊन या खरीप हंगामात धान उत्पादनात ९० टक्के नुकसान होणार आहे. कीडरोगामुळे धान उत्पादक हवालदिल असून त्यांची झोप उडाली आहे. १००१ या जातीच्या धानपिकाला गादमाशीने ९० टक्के ग्रासले असून पीक पोखरले आहे. कृषी विभागाने दखल घेऊन तत्काळ परिस्थितीतची पाहणी करून पुढील निर्णय घ्यावा, ही अपेक्षा आहे. दुरून धान पीक हिरवेगार दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र जवळून निरीक्षण केले असता पीक रोगाने ग्रासले दिसून येत आहे. महसूल व कृषी विभागाने महसूल गाव साजानुसार पीक कापणीचे प्रयोग करून आणेवारी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत अहवाल सादर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. ज्यांच्या शेतात पीक कापणीचे लाॅट टाकले आहेत त्याची यादी संबंधित विभागाने जाहीर करावी. जेणेकरून त्या विभागाच्या गोपनीय अहवालात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
---------------------------
फक्त १०-२० टक्केच उत्पादनाची शक्यता
यंदा भात पिकाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा भात पिकाच्या उत्पादनात १० ते २० टक्के उत्पादन होण्याची शक्यता शेतकरी वर्गात वर्तविली जात आहे. गाद व इतर कीड रोगांमुळे धान उत्पादकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी तरोणे यांनी केली आहे.