पालकमंत्री साहेब थोडे लक्ष गोंदिया जिल्ह्याकडेही द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 05:00 AM2020-05-27T05:00:00+5:302020-05-27T05:00:48+5:30

कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात प्रशासनाच्या थोड्या दुर्लक्षितपणामुळे कोरोनाचा शिरकाव झाला व पाहता पाहता आठ दिवसातच ही संख्या ४८ वर पोहचली. गोंदिया जिल्ह्यासाठी निश्चितच ही चिंताजनक बाब आहे. जिल्ह्यात बाहेरील राज्य आणि जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांपासून कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून क्वारंटाईन कक्ष स्थापन करण्यात आले आहे.

Guardian Minister, pay some attention to Gondia district | पालकमंत्री साहेब थोडे लक्ष गोंदिया जिल्ह्याकडेही द्या

पालकमंत्री साहेब थोडे लक्ष गोंदिया जिल्ह्याकडेही द्या

googlenewsNext
ठळक मुद्देगुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ : प्रशासनावर वचक नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यात जिल्हा प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असताना जिल्हा प्रशासनातील गोंधळ सुध्दा वाढत आहे. तर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मंगळवारी (दि.२६) दिवसा ढवळ्या वर्दळ असणाऱ्या शहरातील मंतर चौक परिसरात गोळीबाराची घटना घडली. अशात कायदा आणि सुव्यवस्थेचा सुध्दा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र राज्याचे गृहमंत्री आणि गोंदियाचे पालकमंत्र्याच्या जिल्ह्यातच हा प्रकार घडत असल्याने दबक्या आवाजात आता लोक आरोप करु लागले आहे. त्यामुळे पालकमंत्री साहेब आपण राज्याची धुरा सांभाळत असताना थोडे लक्ष गोंदिया जिल्ह्याकडे द्या असे म्हणण्याची वेळ जिल्हावासीयांवर आली आहे.
कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात प्रशासनाच्या थोड्या दुर्लक्षितपणामुळे कोरोनाचा शिरकाव झाला व पाहता पाहता आठ दिवसातच ही संख्या ४८ वर पोहचली. गोंदिया जिल्ह्यासाठी निश्चितच ही चिंताजनक बाब आहे. जिल्ह्यात बाहेरील राज्य आणि जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांपासून कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून क्वारंटाईन कक्ष स्थापन करण्यात आले आहे. मात्र क्वारंटाईन कक्षातील नागरिकांना साधे सॅनिटायझर आणि हॅन्डवॉश मिळत नसेल तर इतर सुविधा कितपत मिळत असतील याची कल्पना न केलेलीच बरी. कोविड केअर सेंटर आणि आयसोलेशन कक्षात काही नियमित डॉक्टर काम करण्यास कुचराई करीत आहे. तर सध्या कंत्राटी डॉक्टरांच्या भरोश्यावर हा डोलारा हाकला जात आहे. मात्र त्यांना सुध्दा सुरक्षाविषयक साधने उपलब्ध करुन देण्यास आरोग्य विभाग कुचराई करीत आहे. क्वारंटाईन कक्षात साध्या सुविधा मिळत नसल्याने त्या ठिकाणी कुणी राहण्यास तयार नाहीत ही वास्तविकता आहे. जिल्हा प्रशासन केवळ दिवसभर कोरोना व्यवस्थापनाच्या नावावर बैठका घेण्यात व्यस्त आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हातळण्यासाठी जिल्हा प्रशासन बैठका घेवून कागदावर व्यवस्थापन करण्यात नंबर वन आहे यात कुठलीही शंका नाही. मात्र प्रत्यक्षात उपाययोजना करण्यात मात्र पूर्णपणे फेल ठरले आहे. जिल्ह्यात पहिला कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने ज्या काटेकोरपणे उपाययोजना केल्या होत्या त्याचे सर्वांनीच कौतुक केले होते.
मात्र सध्या स्थितीत दररोज रुग्णांची संख्या वाढत असताना त्याचे नियोजन करताना जिल्हा प्रशासनाची तारांबळ उडत आहे. तर जिल्हा प्रशासनावर सध्या कुणाचाही वचक नाही. त्यामुळेच आपण जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने आपल्याकडून फार अपेक्षा आहेत.पण आपण सुध्दा पुन्हा जुनाच कित्ता गिरवित मुंबई, नागपूरकडेच अधिक लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे. आपण या जिल्ह्याचे तीनदा पालकमंत्री राहिले आहात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची नाडी आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपण थोडावेळ जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने दिल्यास निश्चितच यासर्व समस्या मार्गी लागू शकतील. त्यामुळे जिल्हावासीय आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पालकमंत्री साहेब आमच्या जिल्हाकडेही थोडे लक्ष द्या अशी हाक देत आहेत.

रेती माफियांची हिम्मत वाढली
जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव अद्यापही झालेले नाही.त्यामुळे रेती घाटांवरुन रेती माफीये सर्रासपणे रेतीचा उपसा करीत आहे. तसेच याला मज्जाव करताच ते महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवित आहे. त्यामुळे त्यांच्या वेळीच मुसक्या आवळण्याची गरज आहे. गोंदिया शहरात मंगळवारी दिवसाढवळ्या गोळीबार करण्याची घटना घडली. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपण राज्याचे गृहमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे वेळीच या घटनांकडे लक्ष देऊन याला वचक लावण्याची गरज आहे.
किमान एका क्वारंटाईन सेंटरला भेट द्या
गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पदभार स्विकारल्यानंतर आपण चार ते पाचवेळा जिल्ह्यात आला. त्यानंतर आपले दर्शन झाले नाही. मात्र जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आणि जिल्हा प्रशासन गोंधळलेले असताना आपण जिल्ह्यात येऊन हे सर्व सुरळीत करण्यासाठी वचक निर्माण करण्याची गरज आहे. तसेच जिल्ह्यात आल्यानंतर किमान एका तरी क्वारंटाईन कक्षाला भेट द्यावी.

Web Title: Guardian Minister, pay some attention to Gondia district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.