गोंदिया : रात्रीची भयाण शांतता.. जुनी इमारत.. पडका वाडा आणि त्यामध्ये वटवाघुळांचे अस्तित्व, ही कल्पना भीतीदायक वाटत असली तरी अलिकडे वटवाघूळांची संख्या कमी होत आहे. त्यांचे अस्तित्व नाहीसे झाल्यास निसर्गाचे चक्र बंद पडेल. तसे होऊ नये म्हणून मानवी संघटना व शासन व्यवस्थेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. परंतु याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने पक्षी मित्र संघटनांकडून संताप व्यक्त होत आहे.वटवाघूळ हा सस्तन पक्षी असून वनविभागाच्या शेड्युल पाचमध्ये त्याचा समावेश आहे. वटवाघूळ निशाचर वृत्तीचा पक्षी आहे. रात्रीच्यावेळी किटक, मुंगी, डास, किडे, पाल, विंचू खावून पोट भरणे व दिवसा सूर्य प्रकाशापासून दूर जावून थंड ठिकाणी गुहा किंवा झाडांच्या फांदीला लोंबकळत निंद्रा घेणे अशाप्रकारे दिवस व रात्रीची दिनचर्या असलेल्या उदर गटातील हा प्राणी होय. वाढते शहरीकरण आणि त्यामुळे वाढलेल्या उंच इमारती, वृक्षतोड, उंच इमारतीवरील चमकणाऱ्या काचा आदी कारणांनी वटवाघूळांचे स्थलांतर होताना त्यांचे प्रजनन सुद्धा थांबते.वटवाघूळांची कमी झालेली संख्या हेच कीटक वाढीचे मुख्य कारण आहे. कारण रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणावर कीटकांना खाण्याचे काम वटवाघूळ करतात. एका रात्री एक वटवाघूळ साधारणपणे एक हजार डास फस्त करतो. गावाबाहेर असलेल्या पिंपळ व वड या वृक्षांच्या खाली वटवाघूळे असत. वटवाघूळे व घुबड यांच्याबद्दल समाजात अनेक गैरसमज असले तरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये निसर्ग साखळी वाचविण्यासाठी त्यांची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)
वटवाघुळांचे अस्तित्व आले धोक्यात
By admin | Updated: May 3, 2015 01:28 IST