सीबीआय चौकशीसाठी बंद
By Admin | Updated: May 24, 2014 00:01 IST2014-05-24T00:01:30+5:302014-05-24T00:01:30+5:30
गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा येथील संजय खोब्रागडे यांना रॉकेल टाकून पेटविल्याच्या प्रकरणाला पोलीस वेगळे वळण देत असल्याचा आरोप करीत याप्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाकडून

सीबीआय चौकशीसाठी बंद
संघर्ष समितीचा मोर्चा : गृहमंत्र्याचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निवेदनही दिले
गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा येथील संजय खोब्रागडे यांना रॉकेल टाकून पेटविल्याच्या प्रकरणाला पोलीस वेगळे वळण देत असल्याचा आरोप करीत याप्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाकडून (सीबीआय) किंवा विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करावी, अशी मागणी आंबेडकरवादी संघर्ष समितीने केली. यासाठी दिवसभर गोंदिया शहरात व्यापारपेठ बंद ठेवण्यात आली. त्यासाठी दिवसभर आंबेडकरी कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली. कवलेवाडा येथील संजय खोब्रागडे या दलित कार्यकर्त्याला मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्याच घराच्या ओसरीत झोपेत असताना दि. १६ च्या मध्यरात्री रॉकेल टाकून पेटवून देण्यात आले. ९५ टक्के जळालेल्या खोब्रागडे यांना उपचारासाठी नागपुरात हलविण्यात आले होते. गावातील बुद्ध विहारासाठी जागा मागण्यावरून त्यांचा ग्रामपंचायत पदाधिकारी व बाह्याबाबा मठ समितीच्या काही पदाधिकार्यांशी वाद झाला होता. परंतू समितीच्या पदाधिकार्यांनी त्यांचे म्हणणे मान्य करीत बुद्ध विहारासाठी जागा सोडली होती. दोन महिन्यांपूर्वीच हे प्रकरण संपले असताना अचानक त्यांना पेटवून जिवंत जाळण्याचा हा प्रकार त्याच वादातून झाला असण्याची शक्यता वर्तवित खोब्रागडे यांनी संशयित म्हणून गावच्या महिला सरपंचासह इतर पाच लोकांची नावे आपल्या बयाणात दिली होती. त्या आधारे पोलिसांनी त्या सहाही लोकांना अटक करून त्यांचा पीसीआरसुद्धा मिळविला. एका दलितावर झालेला हा अत्याचार असल्यामुळे याचे पडसाद संपूर्ण विदर्भात व विदर्भाबाहेर उमटणे सुरू झाले. परंतू दोन दिवसानंतर पोलिसांनी या प्रकरणी जखमी संजय खोब्रागडे यांच्यासह त्यांच्या घराजवळच राहणार्या एका इसमाला अटक केली. त्यांचे प्रेमसंबंध असून त्यातूनच त्यांनी संजयचा अडसर दूर करण्यासाठी हे कांड घडविल्याची बाब पोलिसांनी स्पष्ट केली. त्या दोघांना पोलिसांनी अटक केली असली तरी पोलीस आधीच्या राजकीय पक्षांशी संबंधित असलेल्या सहा आरोपींना वाचविण्यासाठी या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा आरोप करीत असल्याचा आरोप आंबेडकरवादी संघर्ष समितीने केला. या प्रकरणी पोलिसांकडून पक्षपातीपणा होत असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. ही मागणी तीव्रपणे मांडण्यासाठी शुक्रवारी गोंदिया शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी गटागटाने शहराच्या व्यापारी लाईनसह अनेक भागात सकाळपासून फिरून व्यापार्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. व्यापार्यांनीही कोणताही विरोध न करता दुकाने बंद करण्यासाठी सहकार्य केले. परंतु याची कल्पना अनेक ग्राहकांना नसल्यामुळे त्यांच्या आग्रहाखातर काही ठिकाणी दुकानांचे शटर अर्धवट उघडे ठेवून साहित्यांचे विक्री सुरू होती. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांनी पेट्रोल विक्रीही बंद पाडल्यामुळे अनेक वाहधारकांची यावेळी मोठी फजिती झाली. सकाळी ११ वाजताच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ असलेल्या तहसील कार्यालयाच्या प्रांगणातून रॅलीला सुरूवात करण्यात आली. ही रॅली आंबेडकर चौक, जयस्तंभ चौक, गांधी चौक, चांदणी चौक, दुर्गा चौक, गोरेलाल चौक, नेहरू चौक मार्गे रेलटोली परिसरात पोहोचली. तेथून पुन्हा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात रॅली पोहोचल्यानंतर डॉ.आंबेडकर चौकात निषेध म्हणून गृहमंत्री आर.आर. पाटील यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. यादरम्यान उपविभागीय अधिकारी दिलीप सावरकर यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आले. हा बंद यशस्वी करण्यासाठी दलित समाजातील राजकीय पदाधिकार्यांसह अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी समाविष्ठ असलेल्या आंबेडकरवादी संघर्ष समितीने पुढाकार घेतला. त्यात अॅड.राजकुमार बोंबार्डे, सतीश बन्सोड़, रतन वासनिक, सुनील आवड़े, योगेश बंसोड, प्रफुल्ल भालेराव, शुद्धोधन शहारे, यशपाल डोंगरे, राजू राहुलकर, योगेश अग्रवाल, आशिम शेख, विलास राऊत, अशोक मेश्राम, विनोद मेश्राम, सोनू दास, विनोद नंदुरकर, ओमकार बंसोड, दिनेश गेडाम, देवा रूसे, वसंत गणवीर, उत्तम मेश्राम, सुशिल ठवरे, दीपेंद्र वासनिक, डी.बी. बोरकर, मिलिंद गणवीर आणि योगेश राऊत यांचा समावेश होता. दरम्यान संजय खोब्रागडे यांचा मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणात आता भारतीय दंड विधानाचे कलम ३०२, जोडण्यात आल्याचे गंगाझरी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी) शहराच्या मार्केट परिसरात समितीच्या कार्यकर्त्यांनी हातात निळे झेंडे घेत आणि घोषणाबाजी करीत घोळक्या-घोळक्यांनी दिवसभर फिरून व्यापार्यांना बंद ठेवण्यास भाग पाडले.