१४०० विद्यार्थी पदवी प्रवेशाविना
By Admin | Updated: July 5, 2015 01:38 IST2015-07-05T01:38:09+5:302015-07-05T01:38:17+5:30
महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यामुळे अडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४००च्या घरात पोहोचली आहे. बारावीच्या पुरवणी परीक्षा निकालानंतर या संख्येत ८७३ विद्यार्थ्यांची भर पडली आहे.

१४०० विद्यार्थी पदवी प्रवेशाविना
वासुदेव पागी ल्ल पणजी
महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यामुळे अडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४००च्या घरात पोहोचली आहे. बारावीच्या पुरवणी परीक्षा निकालानंतर या संख्येत ८७३ विद्यार्थ्यांची भर पडली आहे.
बारावीच्या परीक्षेनंतर विज्ञान, वाणिज्य व कला विभागाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी स्पर्धा निर्माण झाली होती. विद्यार्थी प्रवेशाविना राहिल्यामुळे महाविद्यालयांत राज्यात ५००हून अधिक मुले ही प्रवेशाविना राहिली होती. बारावीच्या पुरवणी परीक्षेनंतर त्यात ८७३ विद्यार्थ्यांची भर पडून ही संख्या १४००वर गेली आहे. त्यामुळे राज्यात महाविद्यालयीन प्रवेशाबाबत समस्या निर्माण झाली आहे.
वाणिज्य व कला विभागात ही समस्या सर्वाधिक असून म्हापसा, पणजी, मडगाव, केपे या ठिकाणी अत्यंत बिकट परिस्थिती आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. मडगाव भागात अधिक विद्यार्थी प्रवेशाविना राहिले आहेत. काणकोण, पेडणे, डिचोली, वाळपई, सांगे या भागात प्रवेशाची समस्या नाही; परंतु उर्वरित भागात कमी-अधिक प्रमाणात ती आहे. उच्च शिक्षण विभागाचे संचालक भास्कर नायक यांनी प्रवेशाची समस्या झाली, ही वस्तुस्थिती असल्याचे सांगितले. त्यासाठी साधनसुविधा असलेल्या काही महाविद्यालयांना नवीन वर्ग सुरू करण्यासाठी मंजुरीही देण्यात आली आहे; परंतु सर्वच महाविद्यालयांत अशा साधनसुविधा नसल्यामुळे वर्ग मंजूर करण्यासाठीही मर्यादा येत असल्याचे ते म्हणाले.
पदवी अभ्यासक्रमाच्या एका वर्गात नियमानुसार जास्तीत जास्त ६० विद्यार्थी असू शकतात. त्यात किंचित बदल करून प्रत्येक वर्गात अतिरिक्त १० विद्यार्थी घेण्यासाठी मंजुरी देण्यात यावी, असा प्रस्ताव उच्च शिक्षण खात्याकडून गोवा विद्यापीठाकडे पाठविला असल्याची माहिती भास्कर नायक यांनी दिली. अद्याप या प्रस्तावाला मंजुरी न मिळाल्यामुळे प्रवेशाची समस्या कायम आहे.