लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आमदार गोविंद गावडे यांचे मन यापुढे भाजपमध्ये रमणार नाही, याची कल्पना भाजपच्या विविध नेत्यांना आलेली आहे. गावडे हे पुढील दीड-दोन वर्ष सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकतात, अशी भावना खांडोळ्यातील गावडे यांच्या आक्रमक सभेनंतर भाजपच्या विविध पदाधिकाऱ्यांची झालेली आहे. गावडे भाजपमध्ये टिकणार नाहीत, ते २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला गुड बाय करतील, असे कोअर टीमच्या काही सदस्यांनाही वाटू लागले आहे.
गोविंद गावडे यांनी मी भाजपमध्ये राहीन, असे रविवारी जाहीर केले तरी प्रत्यक्षात ते मनातून भाजपपासून दूर जाऊ लागले आहेत, याची पूर्ण कल्पना भाजपला आलेली आहे. गावडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना पक्षांतर्गत विरोधकांवर तोफ डागली आहे. ते भाजपमधीलच गोविंदचे विरोधक कोण? याचीही सर्वांना कल्पना आहे. भाजपच्या गोव्यातील सर्वच नेत्यांनी सध्या गावडे यांच्या आक्रमकतेवर 'वेट अॅण्ड वॉच' अशी भूमिका घेतली आहे.
गावडे यांना मंत्रिमंडळातून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी १८ जून रोजी डच्चू दिला. त्यानंतर रविवारी प्रथमच गावडे यांनी जाहीर सभेत एसटी बांधवांशी व इतर लोकांशी खांडोळा येथे संवाद साधला. एक प्रकारे मुख्यमंत्री सावंत यांच्या कृतीबाबत गावडे यांनी तीव्र नापसंती व्यक्त केलीच. शिवाय आपल्याला गेली तीन वर्षे दिल्लीतील केंद्रीय भाजप नेत्यांची भेटदेखील मुख्यमंत्र्यांनी घालून दिली नाही, याबाबत संतापही व्यक्त केला. या सभेत आमदार गोविंद गावडे यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. तसेच अप्रत्यक्षपणे गावडे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याही काही विधानांचा समाचार घेतला.
गावडे हे तांत्रिकदृष्ट्या भाजपमध्ये राहतील. मात्र, ते यापुढे लोकांच्या विविध समस्यांवर बोलत राहतील. कदाचित यापुढे ते काही विषयांवर सरकारला घरचा अहेरही देऊ शकतात, याची कल्पना भाजपच्या नेतृत्त्वाला आली आहे. गोविंद गावडे हे २०२७च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत सरकारची विविध पद्धतीने अडचण करू पाहतील. ते पुढील निवडणूक प्रियोळमधून भाजपच्या तिकिटावर लढणार नाहीत, याची कल्पना भाजपच्या कोअर टीमच्या काही सदस्यांना आली आहे. ते राजीनामा देऊन मध्येच आमदारकी सोडणार नाहीत, हेही भाजपला ठाऊक आहे.
सभापती करायचे की मंत्री, पक्षश्रेष्ठी ठरवतील : काब्राल
लोकशाहीनुसार देश चालतो. त्यामुळे काम केले नाही तर लोक आमदारांनाही घरी पाठवतील. लोकांनी निवडून दिल्यानंतर तुम्ही त्यांची कामे करणे अपेक्षित आहे. बाकी मंत्रिपद देणे किंवा सभापती बनवणे, हे पक्षश्रेष्ठी ठरवतील. पण, आपले प्राधान्य लोकांच्या कामांना असले पाहिजे, असे आमदार नीलेश काब्राल यांनी सांगितले. सोमवारी मंत्रालयात पत्रकारांनी काब्राल यांना तुम्हाला सभापतिपद मिळणार काय? असा प्रश्न विचारल्यानंतर ते बोलत होते. आम्हाला लोक निवडून देतात. त्यामुळे आम्हाला कुठल्याही पदापेक्षा लोकांच्या कामावर भर द्यावा लागतो. आम्ही लोकांची कामे केली नाहीत तर लोक आम्हाला घरी बसवू शकतात. सभापतिपद किंवा मंत्रिपद पुढे मिळतात, असे सांगून काब्राल यांनी सभापतिपदाबाबत आपल्याशी कोणीही चर्चा केली नसल्याचे सांगितले.
माझी तुलना करू नका
पक्षाने माझे मंत्रिपद काढले म्हणून माझ्या मतदारसंघातील कामे कमी झालेली नाहीत. मी माझ्या मतदारसंघात कामे करत आहे. मंत्रिपद काढले तरी मी खूश आहे. मी पक्षासोबत आहे आणि पक्षाचे कामही जोरात करत आहे. त्यामुळे माझे मंत्रिपद काढले म्हणून अन्य कुणाशीही माझी तुलना करू नये. मंत्रिपदी असताना मी अनेक कामे केली आहेत. आताही माझी कामे सुरूच आहेत, असेही काब्राल म्हणाले.
गोविंद भाजपमध्ये आहेत असे वाटत नाही : विजय सरदेसाई
आमदार विजय सरदेसाई म्हणाले, माशेलमधील सभेत गावडे यांनी आपण भाजपमध्ये आहोत, असे विधान केले असले तरी त्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींवर केलेले आरोप पाहता ते मनापासून पक्षात आहेत, असे वाटत नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यावरही गावडेंनी आरोप केले आहेत. पण, दामूंना काढण्याचे धाडस आहे का? गावडेंनाही पक्षातून काढले जाणार नाही. कारण सर्वच या भ्रष्टाचारात सहभागी आहेत, असा टोलाही सरदेसाईंनी लगावला.
भ्रष्टाचाराच्या आरोपांवर आता भाजपने बोलावे : फेरेरा
गोविंद गावडे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर भाजपने स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. कारण मंत्री म्हणून आपल्याच सरकारवर आरोप करणे हे अत्यंत गंभीर असून, भाजपनेही यावर बोलावे, असे आमदार अॅड. कार्ल्स फेरेरा यांनी म्हटले आहे. आपल्याच सरकारविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप गावडे यांनी केले. या आरोपांनंतर त्यांना मंत्रिपदावरून हटवण्यात आले, ही वेगळी गोष्ट. मात्र, प्रत्यक्षात भाजपने त्यावर स्पष्टीकरण देण्याची गरज आहे, असेही अॅड. फेरेरा म्हणाले.