कॉँग्रेसच्या निष्क्रिय नेत्यांचा नंबर कधी?
By Admin | Updated: June 23, 2014 01:38 IST2014-06-23T01:28:16+5:302014-06-23T01:38:24+5:30
दिग्विजय सिंग गुरुवारी गोव्यात : प्रवक्त्यांच्या हकालपट्टीनंतर विचारणा

कॉँग्रेसच्या निष्क्रिय नेत्यांचा नंबर कधी?
पणजी : निष्क्रिय प्रवक्त्यांना काँग्रेसने बाहेरचे दरवाजे दाखवल्यानंतर आता पक्षातील निष्क्रिय नेत्यांची पाळी कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यात अपयशी ठरलेल्या काँग्रेसच्या कुचकामी नेत्यांबद्दल पक्षातच तीव्र असंतोष आहे. त्यामुळे अशा नेत्यांना नारळ कधी देणार, याची काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्सुकता आहे.
२0१२ च्या विधानसभा निवडणुकीत फॅमिली राजने धोका दिलेल्या कॉँग्रेसला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही दोन्ही जागांवर पराभव पत्करावा लागला. तरीही काँग्रेसमधील गटबाजी संपलेली नाही. नेत्यांची टोकाची निष्क्रियता, अंतर्गत गटबाजी आणि धुसफूस आता लपून राहिलेली नाही. दोन्ही निवडणुकांत पाठोपाठ दारुण
पराभव पत्करावा लागल्याने या सर्व गोष्टी आता उघड झाल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष
जॉन फर्नांडिस यांच्याशी अनेकांचे पटत नाही. कोणाचीही भीडमुर्वत न ठेवता बोलत असल्याने ते नाराजी
ओढवून घेतात.
ज्युनियर राणे अर्थात विश्वजीत यांचा प्रदेशाध्यक्षांना नेहमीच विरोध असतो. खाण घोटाळ्यात ठपका असलेले माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, आयडीसी घोटाळा प्रकरणी आमदार बाबू कवळेकर हे कधी कारवाईला सामोरे जातील, याची शाश्वती नसल्याने तोंड बंदच ठेवून आहेत. आमदार बाबूश मोन्सेरात काँग्रेसमध्ये असले तरी ते आपल्याला स्वतंत्र मानतात. ते आपला सावकारी, रियल इस्टेट, हॉटेल्सचा धंदा सांभाळून आहेत. पत्नी ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात तसेच आमदार पांडुरंग मडकईकर हा त्यांचा गट मानला जातो.
काँग्रेस विधिमंडळातच आमदारांमध्ये तीन गट आहेत. बाबूश मोन्सेरात, पत्नी जेनिफर व पांडुरंग मडकईकर एक गट, दिगंबर कामत व बाबू कवळेकर दुसरा गट आणि राणे पिता-पुत्र तिसरा असे हे गट आहेत. त्यामुळे आमदारांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत. केवळ आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स हेच तेवढे निष्ठावान दिसतात. माविन गुदिन्हो यांनी तर काँग्रेसवर उघड तोंडसुख घेणे सुरू केले आहे. त्याही पुढे जाऊन बाबूश यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपण काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारासाठी कामच केले नाही, असे जाहीर सांगितले होते.
दरम्यान, माजी आमदार तथा प्रवक्तेपदावरून काढून टाकलेले जितेंद्र देशप्रभू म्हणाले की, निष्क्रियता का आली याची कारणे शोधण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यात नेते का कमी पडले हे शोधण्याची गरज आहे. कोणीही निष्क्रिय नसतो, त्यासाठी वातावरण आणि काही कारणे असू शकतात. निष्क्रियता ही कारवाईसाठी प्राथमिकता असता कामा नये. विरोधी पक्षनेत्याचे विधानसभेतील काम चांगले आहे. प्रत्येक काम सत्ताधाऱ्यांना घेरूनच करून घेता येईल, असे नाही. राणे मुत्सद्दी आहेत. प्रवक्तेपदावरून हटविल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, तरुणांना वाव देण्यासाठी पक्षाने हे पाऊल उचलले असेल तर त्याचे मी
स्वागत करतो. (प्रतिनिधी)