दिल्लीत ‘जोर-बैठका’
By Admin | Updated: June 10, 2014 01:50 IST2014-06-10T01:44:33+5:302014-06-10T01:50:05+5:30
पणजी : गोव्याला केंद्राकडून येणे असलेले २९४ कोटी रुपये, अतिरिक्त अर्थसाहाय्य, खाणी, पर्यावरण, नगरविकास आदी विषयांसंदर्भात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी दिल्लीत

दिल्लीत ‘जोर-बैठका’
पणजी : गोव्याला केंद्राकडून येणे असलेले २९४ कोटी रुपये, अतिरिक्त अर्थसाहाय्य, खाणी, पर्यावरण, नगरविकास आदी विषयांसंदर्भात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह व्यंकय्या नायडू, नितीन गडकरी आदी केंद्रीय मंत्र्यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन काही विषयांबाबत चर्चा केली. हे ‘जोर-बैठकां’चे सत्र मंगळवारीही चालू राहाणार आहे.
अर्थमंत्री जेटली यांनी सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांची सोमवारी बैठक घेतली. केंद्राकडून यापुढे मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाबाबत सर्व राज्यांची मते अजमावून पाहण्याच्या हेतूने ही बैठक बोलविण्यात आली होती. अन्न सुरक्षा कायद्याची प्रभावीरीत्या व योग्य तेवढ्याच खर्चात अंमलबजावणी सर्व राज्यांनी करावी, अशी सूचना जेटली यांनी केली. गेल्या काही वर्षांत देशाची आर्थिक स्थिती खालावली. त्यावर मात करायची आहे. काही राज्यांनी मात्र चांगली आर्थिक वाढ दाखविली आहे. देशात सार्वजनिक वितरण व्यवस्था मजबूत करायला हवी व भारतीय अन्न महामंडळाचीही फेररचना करणे गरजेचे आहे, असे मुद्दे जेटली यांनी मांडले.
मुख्यमंत्री पर्रीकर यांनीही या बैठकीत भाग घेतला व केंद्रीय अर्थसंकल्पातून गोव्याला काय अपेक्षित आहे, याबाबत काही मते मांडली. नंतर स्वतंत्ररीत्याही ते जेटली यांना भेटले. गोव्याला केंद्राकडून विक्रीकराचे २९४ कोटी रुपये येणे आहे. हा विषयही मुख्यमंत्र्यांनी जेटली यांच्यासमोर मांडला. आर्थिकदृष्ट्या गोव्याची स्थिती कशी आहे व गोव्याला केंद्राकडून कोणत्या कामांसाठी कसकसे अर्थसाहाय्य अपेक्षित आहे, याविषयीही पर्रीकर यांनी जेटली यांच्याशी चर्चा केली. त्यांना निवेदनही सादर केले. केंद्रीय मंत्री नायडू यांचीही त्यांनी भेट घेतली. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनाही ते आज मंगळवारपर्यंत
भेटणार आहेत. (खास प्रतिनिधी)