सत्तरीत झाडांची कत्तल
By Admin | Updated: June 4, 2014 01:36 IST2014-06-04T01:33:39+5:302014-06-04T01:36:14+5:30
वाळपई : नव्या लागवडीच्या नावाखाली सत्तरीत वन खात्याकडून झाडांची कत्तल सुरू केली आहे.

सत्तरीत झाडांची कत्तल
वाळपई : नव्या लागवडीच्या नावाखाली सत्तरीत वन खात्याकडून झाडांची कत्तल सुरू केली आहे. वन खात्याने चालविलेल्या कृत्यामुळे वन्यजीवांवर संकट उभे राहाण्याची भीती असून, असा प्रकार करंजोळ, हिवरे, कुडशे व सध्या ठाणे डोंगुर्ली येथे सुरू आहे. ठाणे-डोंगुर्ली येथील सर्वे क्र. १५ मध्ये असगी क्षेत्रात सध्या ५० हेक्टर जमिनीत वनखात्यातर्फे झाडांची कत्तल सुरू आहे. मुख्य म्हणजे ज्या ठिकाणी कत्तल सुरू आहे, ते क्षेत्र म्हादई अभयारण्यात येते. त्यामुळे वन खात्याच्या प्रकाराबद्दल ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करीत आहेत. वन खाते काजू लागवडीच्या नावाखाली मोठमोठी झाडे तोडीत आहे. फणस त्यानंतर त्या जमिनीत उपयोगी नसलेली झाडे लावीत असून, त्याचा कोणालाही फायदा होताना दिसत नाही. ज्या ठिकाणी जंगलतोड सुरू आहे, त्या ठिकाणी सांबर, हरण, गवारेडा, माकडे या वन्यप्राण्यांचा वावर आहे. त्या वन्य प्राणी कुमयो या झाडापासून मिळणार्या फळाचा वापर अन्न म्हणून करीत असल्याने त्याचीच कत्तल सुरू आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या मोकळीकतेवरच घाला घालण्याचा हा प्रकार वाटू लागला आहे. कत्तल करण्यात आलेल्या झाडांमध्ये सागवान, किनळ व कुमयो प्रकारातील झाडांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे वनखात्याच्या या वागण्यामुळे कुंपणच शेत खाते, तर दाद कुणाकडे मागायची, असा सवाल उपस्थित होत आहे. सामान्य जनतेला म्हादई अभयारण्यात जातासुद्धा येत नाही. त्या ठिकाणी असलेले एक झाडसुद्धा तोडण्याची परवानगी नाही. मग वन खातेच झाडांची कत्तल करू लागले, तर झाडांचे रक्षण कुणी करायचे, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. ज्यांची झाडांची सुरक्षा करण्यासाठी नेमणूक केली आहे, त्यांनाच झाडे तोडण्याचे कंत्राट मिळाल्याचे वाटते. वन खात्याच्या या वृत्तीमुळे म्हादई अभयारण्याला धोका निर्माण झाला आहे. वन खाते सत्तरीत ठिकठिकाणी म्हादई अभयारण्यात मोठमोठ्या झाडांची कत्तल करीत आहे. पर्यावरण संरक्षणासाठी वन खात्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. (प्रतिनिधी)