सत्तरीतील कार्यकर्ते, ग्रामस्थ आक्रमक
By Admin | Updated: April 13, 2015 01:17 IST2015-04-13T01:17:09+5:302015-04-13T01:17:20+5:30
ठाणे-सत्तरी : पाली येथे लागण झालेल्या गूढ साथीचे नेमके निदान करण्यास तसेच ही साथ आटोक्यात आणण्यास सरकारला अपयश आले

सत्तरीतील कार्यकर्ते, ग्रामस्थ आक्रमक
ठाणे-सत्तरी : पाली येथे लागण झालेल्या गूढ साथीचे नेमके निदान करण्यास तसेच ही साथ आटोक्यात आणण्यास सरकारला अपयश आले असून ग्रामीण भागातील सार्वजनिक आरोग्याबाबतही हेळसांड सुरू असल्याचा आरोप रविवारी ठाणे येथे झालेल्या झालेल्या सत्तरीतील सेवाभावी कार्यकर्ते व रहिवाशांच्या बैठकीत करण्यात आला.
पालीतील साथ व सार्वजनिक आरोग्य याबाबत चर्चा करण्यासाठी सत्तरीतील सेवाभावी कार्यकर्त्यांतर्फे ठाणे येथील ग्रामीण आरोग्य केंद्राजवळ ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला सत्तरीतील विविध भागातील सेवाभावी कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच ठाणे-डोंगुर्ली पंचायत क्षेत्रातील नागरिक या बैठकीत सहभागी झाले होते.
सरकारचे दुर्लक्ष
पाली भागात पसरलेली साथ नियंत्रणात आणण्यास तसेच या साथीचे नेमके निदान करण्यास आरोग्य खात्याला अपयश आले असून ही सरकारची निष्क्रियता आहे, असा आरोप सत्तरी युवा जागृती मंचाचे अध्यक्ष विश्वेश प्रभू परोब यांनी केला. तसेच आरोग्याबाबत होणारी हेळसांड, दारूचे व्यसन, अंधश्रध्दा यामुळे समाजाचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.
समाजकार्यकर्ते सीताराम गावस यांनी साथ आटोक्यात आणण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलण्याची मागणी केली. तसेच लोकशिक्षणाबरोबरच आरोग्य जागृती घडवून आणावी, असे आवाहन केले.
लेखिका तथा सामाजिक कार्यकर्त्या नमन सावंत यांनी ही साथ आटोक्यात आणण्यास इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे सांगून सामाजिक आरोग्य बिघडण्यास नागरिकही जबाबदार असल्याचे सांगितले. साथीचे नेमके निदान करून साथ नियंत्रणात आणणे हे सरकारचे काम आहे; पण सार्वजनिक आरोग्य राखणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. सार्वजनिक आरोग्याबाबत दीर्घकालीन उपाय हवेत. तसेच शिक्षण, आरोग्य जागृती याचा प्रसार व्हायला हवा.
शौचालये निष्कृष्ट दर्जाची
सरकारतर्फे पुरवण्यात येणारी शौचालये निष्कृष्ट दर्जाची असून वापरण्यालायक नाहीत. चांगल्या दर्जाचे शोचालय उभारण्यासाठी सरकारने अनुदान वाढवायला हवे, अशी मागणी या वेळी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली.
केरी येथील सामाजिक कार्यकर्ते विष्णू पारोडकर यांनी साथीसारखे प्रकार घडण्यास मूलभूत विकासाकडे झालेले दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे सांगून विकासाच्या नावाने मोठमोठे प्रकल्प उभारण्यापेक्षा नागरिकांच्या मूळ गरजांकडे अधिक लक्ष द्यायला हवे, असे सांगितले. सालेली येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावस यांनी ही साथ आटोक्यात आण्यासाठी तातडीने उपाय योजण्याचे आवाहन केले. यावेळी पांडुरंग गावस, आत्माराम गावस, उल्हास नाईक, तुळशीदास गावकर, बाळकृष्ण नाईक, श्रीपाद पार्सेकर, रमेश गावस, अर्जुन म. गावकर, गाब्रियल कॉस्ता, विश्वनाथ नेने, पद्माकर केळकर इत्यादींनी मते मांडली. सभेचे संचालन आत्माराम गावस यांनी केले.(खास प्रतिनिधी)