खंडित विजेमुळे पाण्यासाठी पायपीट
By Admin | Updated: May 21, 2014 01:57 IST2014-05-21T01:57:19+5:302014-05-21T01:57:19+5:30
पणजी : खंडित विजेमुळे राज्यभरात ठिकठिकाणी पाणीपुरवठ्याचाही खेळखंडोबा झाला.

खंडित विजेमुळे पाण्यासाठी पायपीट
पणजी : खंडित विजेमुळे राज्यभरात ठिकठिकाणी पाणीपुरवठ्याचाही खेळखंडोबा झाला. वास्को, मडगाव, म्हापसा आदी शहरांसह सत्तरीतही काही भागांना गेले दोन दिवस अपुरा पाणीपुरवठा झाल्याने लोकांचे हाल झाले. वेर्णा येथील पंप विजेअभावी बंद राहिल्याने वास्को शहराला मंगळवारी केवळ २५ एमएलडी इतकेच पाणी मिळाले. त्यामुळे गृहिणींना पाण्यासाठी पायपीट करावी लागली. ओपा प्रकल्प विजेअभावी बंद राहाणार असल्याने गुरुवारी तिसवाडी आणि फोंडा तालुक्यांना पाणी मिळणार नसून राजधानी शहरवासियांनाही पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. पुढील तीन-चार दिवस देखभाल, दुरुस्तीसाठी ‘तिळारी’ही बंद ठेवण्यात येणार असल्याने अस्नोडा प्रकल्पाला पाण्याची टंचाई भासणार आहे. बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता (पाणी विभाग) दत्तात्रय बोरकर यांना विचारले असता, वीज खंडित होण्याच्या प्रकारांमुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय आल्याचे सांगितले. गुरुवारी दुरुस्तीचे काम असल्याने ओपा प्रकल्प बंद राहाणार आहे. वास्कोची रोजची पाण्याची गरज ६५ एमएलडी इतकी आहे; परंतु मंगळवारी केवळ २५ एमएलडीच पाणी दिल्याचे बोरकर यांनी मान्य केले. वास्को शहरासाठी येणारे साळावलीचे पाणी वेर्णाहून पंप करून घेतले जाते. वीजपुरवठा खंडित झाल्याने वेर्णाहून पंपिंग होऊ शकले नाही. (प्रतिनिधी)