पणजीचे ‘वीजग्रहण’ सुटणार
By Admin | Updated: July 8, 2015 01:42 IST2015-07-08T01:42:34+5:302015-07-08T01:42:48+5:30
पणजी : थिवी-कदंब पठार-फोंडा अशी ४५ किलोमीटरची ११0 केव्ही वीजवाहिनी पूर्णपणे बदलण्यात येणार असून पुढील काही दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू

पणजीचे ‘वीजग्रहण’ सुटणार
पणजी : थिवी-कदंब पठार-फोंडा अशी ४५ किलोमीटरची ११0 केव्ही वीजवाहिनी पूर्णपणे बदलण्यात येणार असून पुढील काही दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर राजधानीवासियांना खंडित वीजपुरवठ्याचा मनस्ताप भोगावा लागू शकतो. एकदा ही वीजवाहिनी बदलल्यानंतर मात्र पणजीतील वीज समस्या कायमस्वरूपी सुटेल, असा दावा अधिकारी करत आहेत.
६0 कोटी रुपये खर्चाच्या या कामाचे कंत्राट पुणे येथील स्टरलाईट कंपनीला देण्यात आले आहे. प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती खात्याचे जनसंपर्क अधिकारी कार्यकारी अभियंता टी. ए. वर्गिस यांनी दिली.
राजधानीत वीज समस्या इतकी बिकट आहे की, साधा जंपर तुटला तरी वीज गायब होऊन दुरुस्तीकामाला अर्धा दिवस लागतो. त्यामुळे शहरातील व्यावसायिकांचे नुकसान तर होतेच; शिवाय कार्यालयीन कामकाजही खोळंबते. कंडक्टर्स निकामी होत असल्याने वरचेवर बदलावे लागतात. राजधानीतील वीजपुरवठा या ११0 केव्ही वाहिनीवर अवलंबून आहे. ही संपूर्ण वीजवाहिनीच बदलली जाणार असल्याने या कामासाठी म्हणून ‘शट डाउन’ घ्यावे लागतील. अर्थात खंडित वीजपुरवठ्याबद्दल पूर्वसूचना देण्यात येईल.
वीज बिले घरबसल्या आॅनलाईन भरण्यासाठी ‘ई-पेमेंट’ व्यवस्था करण्यात आली खरी; परंतु त्याचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांची संख्या अगदीच कमी आहे. तिसवाडी तालुक्यात ८0 हजार वीज ग्राहक आहेत; परंतु त्यातील केवळ १२00 जणच या योजनेचा लाभ घेतात. हे प्रमाण १.५ टक्के इतके अत्यल्प आहे.
बिले तयार करण्याचे काम गोवा इलेक्ट्रॉनिक लिमिटेडकडे सोपविल्यापासून ग्राहकांना दर महिन्याला वेळेत बिले मिळू लागली आहेत. त्यामुळे आता बिलांसाठी विलंब होत असल्याच्या तक्रारीही येत नाहीत, असे वर्गिस यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)