उत्तरेच्या निकालाबाबत लोकांत औत्सुक्य कमी
By Admin | Updated: May 16, 2014 01:06 IST2014-05-16T01:03:29+5:302014-05-16T01:06:14+5:30
पणजी : दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाच्या तुलनेत उत्तर गोव्यातील लोकसभा मतदारसंघाच्या निकालाबाबत जनतेत औत्सुक्य कमी आहे.

उत्तरेच्या निकालाबाबत लोकांत औत्सुक्य कमी
पणजी : दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाच्या तुलनेत उत्तर गोव्यातील लोकसभा मतदारसंघाच्या निकालाबाबत जनतेत औत्सुक्य कमी आहे. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात लढत एकतर्फीच झाली असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून मानले जात आहे. भाजपचे खासदार श्रीपाद नाईक यांना उत्तर गोव्यात किती मतांची आघाडी मिळतेय याकडेच उत्तर गोवा भाजपचे लक्ष लागून आहे. भाजपने या वेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा जास्त पैसा खर्च केला. ख्रिस्ती व मुस्लिम धर्मीय मतदार पूर्णपणे भाजपच्या बाजूने राहिले, असा निष्कर्ष काढण्यासारखी स्थिती उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातही आहे. मात्र, उत्तर गोव्यातही महिलांनी जास्त प्रमाणात मतदान केले आहे. हिंदू बहुसंख्य असलेल्या उत्तर गोव्यातील अनेक मतदारसंघांत खासदार श्रीपाद नाईक यांना लोकांनी मतदान केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा परिणामही उत्तरेतील अशा काही तालुक्यांमध्ये निवडणूक काळात दिसून आला. बहुतांश ख्रिस्ती धर्मगुरू काँग्रेसच्या बाजूने राहिले. पर्रीकर सरकारवर जे घटक नाखूश होते, त्यांनी उत्तरेतही भाजपच्या विरोधात मतदान केले; पण याच सरकारने आणलेल्या काही योजनांमुळे महिलावर्गाने भाजपला एकगठ्ठा मते दिली, असेही मानले जात आहे. केंद्रात मोदी सरकार आले तर गोव्यातील खनिज व्यवसाय सुरू होईल, असे वाटल्यानेही उत्तर गोव्यातील खाणग्रस्त भागांतील मतदार भाजपच्या बाजूने राहिले, असे मानणारे लोक अनेक आहेत. भाजपची उत्तर गोव्यातील संघटनात्मक बांधणी मजबूत आहे. श्रीपाद नाईक यांच्याविषयी अॅण्टी इनकम्बन्सी होती; पण संघटना ठामपणे नाईक यांच्या बाजूने राहिली. त्या तुलनेत काँग्रेस पक्ष पूर्णपणे फिका पडला. काँग्रेसचे उमेदवार रवी नाईक आणि जॉन फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष यांचा परस्परांशी मोठासा संबंध नाही, असा अनुभव निवडणुकीवेळी जनतेला आला. काँग्रेसच्या काही सभाही निवडणुकीवेळी फ्लॉप ठरल्या. काही आमदारांनी कामही केले नाही. गोमंतक भंडारी समाजातीलही बहुसंख्य मते भाजप उमेदवाराच्या बाजूने गेली, असे मानले जात आहे. आम आदमी पार्टीचे उमेदवार डॉ. दत्ताराम देसाई व अपक्ष उमेदवार दयानंद नार्वेकर यांना लोकांनी किती मते दिली आहेत, तेही शुक्रवारी स्पष्ट होणार आहे. (खास प्रतिनिधी)