सायबर क्राईमचे प्रमाण वाढले
By Admin | Updated: February 2, 2017 00:30 IST2017-02-02T00:30:17+5:302017-02-02T00:30:17+5:30
कॅशलेस व्यवहारात सायबर क्राईमचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ग्राहकांच्या खात्यातील रक्कम परस्पर काढली जात आहे.

सायबर क्राईमचे प्रमाण वाढले
सावधानतेचा इशारा : बँकेतून खात्री करुनच व्यवहार करावा
ब्रह्मपुरी : कॅशलेस व्यवहारात सायबर क्राईमचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ग्राहकांच्या खात्यातील रक्कम परस्पर काढली जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी कुठलीही माहिती मोबाईल वर न देता बँकेत परस्पर जाऊन व्यवहार करण्याचे आवाहन बँकेच्या व्यवस्थापकांनी केले आहे.
मागील आठ दिवसांमध्ये दोन ते तीन ग्राहकांच्या खात्यातील रक्कम फसवा कॉल करुन काढल्या जाण्याचे प्रकार उघडकीस आले आहे. निनावी कॉल करुन एटीएम बंद पडल्याचे सांगून सुरु करण्याविषयी आग्रह केला जातो. मी बँकेचाच कर्मचारी बोलत असल्याचे सांगून संपूर्ण माहिती विचारली जाते व काही तासानंतर खात्यामधून शिल्लक रक्कम पूर्णच्या पूर्णच काढली जाण्याचे प्रकार प्रस्तूत प्रतिनिधी व बँक व्यवस्थापनासमोर उघडकीस आले असल्याने पुन्हा ग्राहकांची दिशाभूल होऊ नये म्हणून व्यवस्थापकांनी ग्राहकांना सावधनतेचा इशारा दिलेला आहे. कोणताही निनावी कॉल आल्यास आपल्या एटीएम संदर्भात माहिती देवू नये व तशा कॉलवर जास्त वेळ न बोलता तो बंद करुन घ्यावा. त्यानंतर ज्या बँकेत आपला खाता असेल, त्या शाखेत जाऊन विचारपूस करावी. बँकेतून फोन आलाच तर लॅडलाईनवरुन येत असल्याने आपल्या शहराचा कोड नंबर आपल्याला ओळखता येतो. त्यावरुन हा फोन बँकेतूनच आला, हे समजण्यास मदत होत असते. बँक कोणत्याही ग्राहकाला शक्यतो फोन करीत नाही व मोबाईलवरुन तर बँकेचा कोणताही कर्मचारी फोन करीतच नाही. त्यामुळे मोबाईलवर आलेल्या निनावी फोनवरुन आपल्या पर्सनल अकाऊंट अथवा एटीएमची माहिती कोणत्याही ग्राहकांनी देऊ नये, असे आवाहन सर्वच बँक शाखेच्या व्यवस्थापकांनी खातेदारांना केली आहे. सायबर क्राईमचे प्रमाण सध्या वाढले आहे. अशा क्राईमचा शोध घेण्यासाठी अडचणी येत असल्याने काढल्या गेलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता कमीच असते. त्यामुळे ग्राहकांनी वाढत्या सायबर क्राईमच्या गुरफट्यात येऊ नये व शंका आल्यास थेट बँकेत संपर्क साधावा, असेही बँक व्यवस्थापन व पोलिसांनी म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)