राज्यात एप्रिलपासून हेल्मेटसक्ती
By Admin | Updated: January 10, 2015 01:24 IST2015-01-10T01:21:30+5:302015-01-10T01:24:27+5:30
वाहतूक खाते दक्ष : सर्व रस्त्यांवर, मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट बंधनकारक?

राज्यात एप्रिलपासून हेल्मेटसक्ती
पणजी : राज्यात दुचाकींच्या होणाऱ्या अपघातांतून चालकांच्या मृत्यूची वाढती संख्या लक्षात घेता एप्रिल २0१५पासून सर्व रस्त्यांवर हेल्मटसक्ती करण्याचा निर्णय वाहतूक खात्याने घेतला आहे. चालक आणि मागे बसणाऱ्या स्वारासही हेल्मेट वापरणे सक्तीचे होणार आहे.
येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत वाहतूक खात्याचे संचालक अरुण देसाई यांनी माहिती दिली. गेल्या दोन वर्षांची तुलना करता राज्यात दुचाकी अपघातांचे प्रमाण वाढत आहे. यात हेल्मेट न वापरल्यामुळे अपघातस्थळी मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच चालकाच्या मागे बसणाऱ्यासही अपघातात हेल्मेट नसल्याने आपला जीव गमवावा लागतो, असे अहवालातून स्पष्ट होते.
येत्या एप्रिल महिन्यापासून दुचाकीस्वार चालक आणि मागे बसणाऱ्यासही राज्यातील सर्व रस्त्यांवर हेल्मटसक्ती केली जाईल. अंतर्गत रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांतही चालकांना हेल्मेट न वापरल्यामुळे प्राणाला मुकावे लागते, असे देसाई म्हणाले.
राज्यात २0१४ साली आॅक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यांत सर्वाधिक अपघात झाले. एकूण अपघातांपैकी ६८ टक्के अपघात हे सरत्या वर्षाच्या या तीन महिन्यांत होतात, असा अहवाल प्राप्त झाला आहे. २0१३ साली या तीन महिन्यांत एकूण ४0 दुचाकीस्वार व १0 सहप्रवाशांना अपघातांत जीव गमवावा लागला, तर २0१४ सालच्या याच तीन महिन्यांत ३८ दुचाकीस्वार व ५ सहप्रवाशांना जीव गमवावा
लागला आहे.
राज्यात २0१४ च्या सुरुवातीच्या सहा महिन्यांत १७0 अपघात झाले. यात १११ दुचाकीस्वारांना, तर ३७ पादचाऱ्यांना अपघात झाले. उर्वरित जुलै ते डिसेंबर महिन्यांत १२0 अपघात झाले. यात ७८ दुचाकीस्वार, तर ३१ पादचाऱ्यांना अपघात झाल्याचा अहवाल वाहतूक खात्याने दिला आहे.
(प्रतिनिधी)