लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्याआधी त्यांची बाजू ऐकून घ्यावी असे पक्ष नेतृत्वाने ठरवले आहे. त्यानुसार आज, सोमवारी गोविंद गावडे यांची बाजू मी ऐकून घेतलेली आहे. आता याबाबतचा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठवणार असून दिल्लीतच काय तो निर्णय होईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली.
आज प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व मंत्री गोविंद गावडे यांची बैठक झाली. या बैठकीत नाईक यांनी गावडे यांची बाजू ऐकून घेतली. या बैठकीनंतर भाजपच्या मंत्री, आमदारांचीही बैठक पार पडली. गावडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या आदिवासी कल्याण खात्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने खळबळ उडाली होती. गावडे यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्याचे जवळजवळ निश्चित झाले होते. गेले दोन दिवस दामू दिल्लीत होते. दिल्लीत त्यांनी या विषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला.
दामू रविवारी रात्री गोव्यात पोचले. गावडे यांची बाजू ऐकून घ्यावी, असे ठरले. त्यामुळे सोमवारी सायंकाळी दामूंनी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील शासकीय बंगल्यावर बोलावले. दरम्यान, मंत्री-आमदारांसोबत झालेल्या बैठकीत केंद्रात मोदी सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपने 'संकल्प ते सिद्धी' कार्यक्रम आयोजित केला आहे. पक्षाचे केंद्रीय नेते दुष्यंत कुमार गोव्यात येणार आहेत. गेल्या अकरा वर्षातील मोदी सरकारच्या कामगिरीबद्दल आम्ही तळागाळात लोकांपर्यंत माहिती पोचवणार आहोत. त्याबाबत मंत्री, आमदारांसोबत चर्चा केल्याचेही नाईक म्हणाले.
कारवाई एकतर्फी नको म्हणून चर्चा...
मंत्री गोविंद गावडे यांच्याशी मी चर्चा केली आहे. गावडे यांना मी पक्षाचे धोरण सांगितले आहे. तसेच त्यांचे जे काही म्हणणे आहे ते ऐकून घेतले. पक्षाकडून कारवाई एकतर्फी व्हायला नको, त्यामुळे गावडे यांचे म्हणणे ऐकून घेणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार मी त्यांच्याशी बोललो आहे. आता याबाबतचा सविस्तर अहवाल मी पाठवणार असून केंद्रीय नेतेच काय तो निर्णय घेतील.
दामूंच्या प्रश्नांची उत्तरे दिली : गोविंद गावडे
दामू नाईक यांनी घेतलेल्या बैठकीविषयी पत्रकारांनी काल मंत्री गोविंद गावडे यांना विचारले असता, त्यांनी एका वाक्यातच सांगितले की, 'दामू नाईक यांनी जे काही प्रश्न मला विचारले त्या प्रश्नांची उत्तरे मी त्यांना दिली आहेत.' याव्यतिरिक्त कोणतेही भाष्य करण्याचे गावडे यांनी टाळले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर मौन पाळणेच त्यांनी पसंत केले.