शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गोविंद गावडेंचा बंडाचा झेंडा; मात्र भाजपातच राहणार, भूमिका केली स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 12:42 IST

पक्षांतर्गत विरोधकांवर हल्लाबोल; खांडोळा येथे प्रगती मंचतर्फे आयोजित सभेला लोकांचा मोठा प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क, माशेल : 'मी जे आरोप केलेच नाहीत, ते आरोप प्रसारमाध्यमांकडून माझ्या तोंडी घातले गेले आणि मला मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. ते आरोप खरे आहेत की खोटे आहेत याची चौकशीदेखील कुणी केली नाही, याचा अर्थ ते आरोप खरे असावेत' अशा शब्दात प्रियोळचे आमदार, माजी मंत्री गोविंद गावडे यांनी रविवारी हल्लाबोल केला. मात्र, 'भाजपमध्येच राहून प्रियोळ मतदारसंघाचा विकास करू' असे स्पष्ट करत गावडे यांनी शाब्दिकदृष्ट्या एक प्रकारे बंडाचा झेंडा फडकावला. त्यांची पुढील संघर्षाची वाट काल स्पष्ट झाली.

प्रियोळ प्रगती मंचतर्फे आयोजित खांडोळा येथील जाहीर सभेत गोविंद गावडे यांनी मंत्रिपदावरून काढण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच लोकांसमोर भावना व्यक्त केल्या. सुमारे दोन हजारांहून अधिक लोक यावेळी उपस्थित होते. 

आपल्या वक्तव्याचा घटनाक्रम मांडताना गावडे म्हणाले की, 'मी २५ मे रोजी जे काही बोललो, त्याबद्दल कोणाला काहीच हरकत नव्हती. त्या दिवशी सायंकाळपर्यंत सर्व काही ठीक होते. पण नंतर एका मीडिया हाऊसने माझ्या भाषणाचा शाब्दिक खेळ करत वक्तव्य सर्वासमोर आणले. मी त्या कार्यक्रमानंतर कुटुंबीयांसोबत दुबईला गेलो होतो. पण, तिथे पोहचताच मला ही माहिती समजली आणि मी कुटुंबीयाला तिथेच सोडून थेट परतलो. मुख्यमंत्र्याची भेट घेतली, त्यांच्यासमोर माझी बाजू मांडली. तोपपर्यंत देखील ठीक होते. पण नंतर काय झाले हे मला अजूनही कळालेले नाही. आणि कुणी सांगितलेले देखील नाही'

शिरोडकरांना निवडून आणणारा गोविंद गावडे

शिरोड्यातील २०१९ मध्ये पोटनिवडणुकीत सुभाष शिरोडकरांना निवडून आणणारा माणूस म्हणजे गोविंद गावडे. तेव्हा मी भाजपातदेखील नव्हतो, असे गोविंद गावडे यांनी सांगितले. ते म्हणाले की, दिवंगत मुख्यमंत्री पर्रीकर यांना वाटायचे की मी शिरोडकरांना निवडून आणू शकतो. त्यांचा विशास होता. त्यामुळे हे काम मला देण्यात आले. त्यावेळी भाजपच्या आमदार, मंत्री किंवा कार्यकर्त्यांनीसुद्धा जेवढे काम केले नाही, तेवढे काम मी केले आणि शिरोडकरांचा अवघ्या ७० मतांनी विजय झाला, याची आठवणही गावडेंनी करून दिली.

मी चुकीचे बोललेलो नाही...

गावडे म्हणाले की, 'या घडामोडीनंतर मला राजीनामा देण्यास सांगितले. पण मला हे मान्य नव्हते, कारण मी अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती व आदिवासी समाजातील लोकांचे मुद्दे मांडले. यात काहीच चुकीचे नाही. राजीनामा न दिल्याने मला काढण्यात आले. पण, मी भाजपसोबत राहणार आहे. लोकहितासाठी व प्रियोळकरांच्या विकासासाठी झटणार आहे. केवळ याच लोकांना माझा राजीनामा मागण्याचा अधिकार आहे.

वर्गमित्र मुख्यमंत्री व्हावा म्हणून...

गावडे म्हणाले की, पर्रीकरांनी आजारपणात सुदिन ढवळीकर यांना सरकारचा समन्वय पाहण्यासाठी नेमण्याचे ठरवले, तेव्हा मी त्याला विरोध केला. भाजपच्या आमदारांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागणार होती तेव्हा माझा चांगला मित्र, वर्गमित्र मुख्यमंत्री व्हावा म्हणून मीच डॉ. प्रमोद सावंत यांचे नाव सुचवले होते, असेही ते म्हणाले.

केंद्रीय नेत्यांची भेट घडवून आणली नाही

गावडे म्हणाले की, मी भाजपच्या कोणत्याच केंद्रीय नेत्यांची भेट न घेता राज्यातील नेतृत्वावर विश्वास ठेवून २०२२ मध्ये भाजप प्रवेश केला. निवडून येऊन २०२२ मध्ये मंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि तत्कालीन संघटन मंत्र्यांकडे विनंती केली, माझी केंद्रीय नेतृत्वाकडे ओळख करून द्यावी. मात्र, त्यांनी माझी भेट कधीच घडवून आणली नाही. तेव्हा यामागचे कारण मला कळले नव्हते. मात्र आता कारण समजू लागले आहे. नीलेश काब्राल यांना जेव्हा मंत्रिपदावरून काढले, तेव्हा त्यांची केंद्रीय नेतृत्वाशी भेट घालून दिली गेली. आता माझीदेखील हीच विनंती आहे, असेही गावडेंनी सांगितले.

वक्तव्याची पडताळणी करायला हवी होती

गावडे म्हणाले, 'कला व संस्कृती मंत्री १ असताना विधानसभेतील उच्चपदस्थ व्यक्तीने माझ्यावर १७ लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यावेळी मी लगेच मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितले की यात काहीच तथ्य नाही. पण जर माझ्यामुळे तुमच्या प्रतिमेला डाग लागत असेल तर मी पायउतार होण्यास तयार आहे. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी काहीच सांगितले नाही. आताही जेव्हा मी २५ मे रोजी बोललो, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी खरे तर चौकशी करायला हवी होती की प्रशासनात खरंच काही भ्रष्टाचार चाललाय काय ? पण असे झालेले नाही, उलट मला मंत्रिपदावरून काढले. याचा अर्थ असा होऊ शकतो की मी जे काही म्हटले ते खरे असावे.

लोकांच्या आवाजाला वाट देण्यासाठी

गावडे म्हणाले की, 'गेल्या चार दिवसांत अनेक युवक, ज्येष्ठ व्यक्ती, समर्थक घरी आले. त्यांच्या डोळ्यात अश्रूररूपात अनेक प्रश्न होते. त्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी ही सभा आहे. गोविंद गावडे हे केवळ नाव नाही, व्यक्ती नाही तर प्रियोळकरांचा, आदिवासी समाजातील लोकांचा आवाज आहे. या आवाजाला वाट मोकळी करून देण्यासाठी ही सभा आहे. माझे मन व मत जाणून घेण्याचा अधिकार केवळ प्रियोळकरांनाच आहे.

भाईंना नकार देऊ शकलो नाही...

प्रियोळमध्ये मी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मला भेटायला बोलावले आणि भाजपमध्ये सहभागी होण्यास सांगितले. पण लोकांसाठी मी अपक्षच राहिलो असे सांगून गावडे म्हणाले, 'मी पर्रीकर यांना नकार दिला. पण पाठिंबा देण्याचे ठरवले. मनोहरभाई मृत्यूशी झुंजत होते तेव्हा भेट झाली होती. त्यांनी मला भाजपमध्ये यायला सांगितले. त्यावेळी मी त्यांना नकार देऊ शकलो नाही. भाजपमध्ये आलो.

पंतप्रधान, गृहमंत्र्यांना अहवाल देणार

गावडे म्हणाले की, 'मला केंद्रीय नेतृत्वाला भेटायचे आहे. यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्षांना तसे सांगितले. पण त्यांनी काहीच हालचाली केल्या नाहीत. उलट मला केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशावरून काढले असे सांगण्यात आले. मात्र मुख्यमंत्री छाती ठोकून सांगतात की मी त्यांना काढले. हा फरक अजून मला कळालेला नाही. आता या सभेचा वृत्तान्त हिंदी, इंग्रजी आणि मराठी या तिन्हीमध्ये भाषांतरित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा, राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना पाठविणार आहे. त्यांनाही इथल्या गोष्टी कळायला हव्यात.

मंत्रिपद गेल्यावरही आनंदी

गावडे म्हणाले की, 'मी मंत्रिपदाच्या खुर्चीसाठी राजकारणात आलो नव्हतो, तर लोकांची सेवा करण्यासाठी मी राजकारणात आलो होतो. मी संघर्षातून वर आलो आहे. संघर्ष माझ्या जीवनाचा भाग आहे. लोकांच्या हक्कासाठी संघर्ष करणार आहे. १८ जून या क्रांतिदिनी मंत्रिपद गेले म्हणून मी जास्त आनंदी आहे. कारण यापुढे नवी क्रांती होणार आहे. प्रियोळकर ही क्रांती घडवतील.'

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा