गोवा ते मुंबई केवळ साडेसहा तास; कसे होणार शक्य? काय आहे प्रस्ताव?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2025 07:37 IST2025-02-28T07:35:27+5:302025-02-28T07:37:20+5:30
हा प्रस्ताव प्रत्यक्षात उतरल्यास साडेसहा तासात गोवा ते मुंबई अंतर कापले जाणार आहे.

गोवा ते मुंबई केवळ साडेसहा तास; कसे होणार शक्य? काय आहे प्रस्ताव?
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी:गोवा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांदरम्यान प्रवाशांसाठी एक अभिनव अशी सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव प्रत्यक्षात उतरल्यास साडेसहा तासात गोवा ते मुंबई अंतर कापले जाणार आहे.
'मुंबई ते गोवा' हा प्रवास जलमार्गाने करण्यासाठी पर्याय उपलब्ध होणार आहे. तोही 'रो-रो' फेरी सेवेच्या माध्यमातून गोवा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांदरम्यान प्रस्तावाची या शक्यता तपासली जात आहे. प्रस्तावित रो-रो सेवा ही मुंबई ते मांडवी दरम्यान आहे. त्यासाठी जहाज विकत घेण्यात आल्याचेही वृत्त आहे. एम-२-एम फेरीजने इटलीतून १५ वर्षे जुने असलेले रो-पॅक्स हे जहाज विकत घेतले आहे. जहाज सध्या मुंबईत असून त्यात आवश्यक दुरुस्तीची कामे केली जात आहेत. पूर्ण नूतनीकरण झाल्यानंतर ते प्रत्यक्ष वापरात आणले जाणार आहे. प्रत्यक्ष वापर सुरू झाल्यावर साडेसहा तासांत गोवा ते मुंबई अंतर कापले जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
प्रत्यक्ष फेरी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक परवाने मिळविण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यात महत्त्वाची लागणारी जहाज वाहतूक महासंचालकाच्या परवानगीसाठी आणि इतर मंजुरीसाठी अर्ज करण्यात आले आहेत. चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी पणजी येथे डॉकिंगला परवानगी मिळावी यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
जहाजात ६२० प्रवासी आणि ६० गाड्या सामावू शकतील. भाडे दर माफक असावा यासाठी केंद्र सरकारकडून इंधन सवलती मिळविण्यासाठी प्रयत्न आहेत. ही योजना पूर्णत्वास आल्यास दोन्ही राज्यांच्या पर्यटन क्षेत्रात विविध प्रकारच्या नव्या संधी उपलब्ध होण्याच्या अपेक्षा आहेत.