कचरा प्रकल्प मार्गी लागेना़़़
By Admin | Updated: May 20, 2014 01:38 IST2014-05-20T01:36:29+5:302014-05-20T01:38:21+5:30
वाळपई : येथील पालिकेच्या कचरा प्रकल्पाचे काम तब्बल पाच वर्षांपासून सुरु आहे़ मात्र, हे काम अद्याप पूर्णत्वास न आल्यामुळे ग्रामस्थांत नाराजीचे वातावरण आहे़

कचरा प्रकल्प मार्गी लागेना़़़
वाळपई : येथील पालिकेच्या कचरा प्रकल्पाचे काम तब्बल पाच वर्षांपासून सुरु आहे़ मात्र, हे काम अद्याप पूर्णत्वास न आल्यामुळे ग्रामस्थांत नाराजीचे वातावरण आहे़ वाळपई पालिकेतर्फे प्रभाग सातमध्ये कचरा प्रकल्पाचे काम पाच वर्षे सुरू आहे. या प्रभागात कचरा प्रकल्प उभारणीसाठी प्रखर विरोध झाला होता, तरीसुद्धा कचरा प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले होते; पण प्रकल्पाचे काम अगदी संथगतीने सुरू असून येणार्या काळात पूर्ण होईल असे दिसत नाही. कचरा प्रकल्प पूर्ण झाला नसल्याने कचरा समस्या मोठ्या प्रमाणात असून पालिकेच्या नियंत्रणाबाहेर आहे. वाळपई पालिकेला कचरा टाकण्यासाठी कोणताही पर्याय नसल्याने सध्या पालिका ज्या ठिकाणी प्रकल्प बांधण्यात येत आहे, त्याच ठिकाणी कचरा टाकत आहे. प्रकल्पाचे काम अजून पूर्ण झाले नाही. त्या कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा बसविण्यात आली नाही, असे असतानादेखील कचरा टाकल्याने त्या परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. आठवडा बाजारच्या दिवशी बाहेरून फेरी घेऊन येणारे शहरात कचरा टाकून जात असतात. तो कचरा कुठे टाकावा याविषयी पालिकेला विचार करावा लागतो. नाईलाजास्तव त्या प्रकल्पातच कचरा टाकावा लागतो. कचरा प्रकल्प लवकरात लवकर उभारावा, असा आदेश न्यायालयाने दिल्यानंतर वाळपई पालिकेने स्वत:च्या निधीतून कचरा प्रकल्पाचे काम हाती घेतले. प्रकल्पासाठी निधी उपलब्ध असताना कामास गती मिळण्याची गरत होती; पण सध्या ते बंदच आहे. त्या प्रकल्पाच्या पायाभरणीवेळी अन्य पायाभरणी केलेले प्रकल्प पूर्ण होऊन उद्घाटनसुद्धा झाले; पण कचरा प्रकल्पाचे काम पन्नास टक्केच झाले आहे. प्रकल्पाचे काम करताना योग्य दर्जा राखला नसल्याने काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्या प्रकल्पावर नगरपालिका अधिकारी योग्यप्रकारे देखरेख करीत नसल्याचे त्या ठिकाणी चाललेल्या कामावरून दिसते.