चोर्ला घाटाची बदनामी रोखण्याची निसर्गप्रेमींची मागणी
By Admin | Updated: June 19, 2014 01:15 IST2014-06-19T01:13:31+5:302014-06-19T01:15:12+5:30
नीलेश शेटकर ल्ल चोर्ला घाट चोर्ला घाटातील पावसाळी निसर्ग पर्यटन व येथील पर्यावरणासंदर्भात सरकारने धोरण निश्चित करण्याची गरज आहे. पर्यटनाच्या नावाखाली

चोर्ला घाटाची बदनामी रोखण्याची निसर्गप्रेमींची मागणी
नीलेश शेटकर ल्ल चोर्ला घाट
चोर्ला घाटातील पावसाळी निसर्ग पर्यटन व येथील पर्यावरणासंदर्भात सरकारने धोरण निश्चित करण्याची गरज आहे. पर्यटनाच्या नावाखाली चोर्ला घाटात येऊन धुडगूस घालणाऱ्या अतिउत्साही पर्यटकांना आवर घालण्यासाठी वेळीच उपाययोजना आखावी, अशी मागणी सत्तरीतील निसर्गप्रेमी व पर्यावरण कार्यकर्ते करीत आहेत.
मान्सून गोव्यात सक्रिय झाला आहे. येत्या एक-दोन आठवड्यांत चोर्ला घाटातील धबधबे वाहू लागतील. नंतर या भागात निसर्गप्रेमींची रीघ लागेल. काही वर्षांपासून चोर्ला घाटात येणाऱ्या निसर्गप्रेमींची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सत्तरी व डिचोली तालुक्याच्या पर्यटन विकासाला नवी चालना मिळाली आहे.
पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांना वळसा घालून जाणाऱ्या गोवा-बेळगाव व्हाया चोर्ला घाट मार्गामुळे चोर्ला घाट परिसर पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. म्हादई अभयारण्य क्षेत्रात मोडणारा हा भाग संवेदनशील पर्यावरण क्षेत्र आहे. समृद्ध वनराई, तसेच पट्टेरी वाघ व इतर जनावरांचे येथे वसतिस्थान आहे. त्यामुळे या भागाची पर्यावरणीय संवेदनशीलता जपणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे; परंतु काही अतिउत्साही निसर्गप्रेमींमुळे या परिसराचे संतुलन बिघडू लागले आहे. साधारण जुलै ते सप्टेंबर-आॅक्टोबरपर्यंत या भागात निसर्गप्रेमींची गर्दी असते.त्यामुळे पर्यटनाला चालना मिळाली असली तरी काही नवे प्रश्न या भागात निर्माण झाले आहेत.