गोव्यात युतीची घोषणा आणि जागावाटप दिवाळीनंतर- उद्धव ठाकरे

By Admin | Updated: October 23, 2016 20:33 IST2016-10-23T20:33:16+5:302016-10-23T20:33:16+5:30

गोवा सुरक्षा मंचसोबत युतीची तसेच जागावाटप आणि निवडणूक मुद्यांसंबंधी घोषणा या दिवाळीनंतर जाहीर केली जाईल असे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

Declaration of coalition alliance in Goa and after Diwali - Uddhav Thackeray | गोव्यात युतीची घोषणा आणि जागावाटप दिवाळीनंतर- उद्धव ठाकरे

गोव्यात युतीची घोषणा आणि जागावाटप दिवाळीनंतर- उद्धव ठाकरे

>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 23 - गोवा सुरक्षा मंचसोबत युतीची तसेच जागावाटप आणि निवडणूक मुद्यांसंबंधी घोषणा या दिवाळीनंतर जाहीर केली जाईल असे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. सध्या बोलणी प्राथमिक स्तरावर असल्याचे ते म्हणाले.
गोव्यात शिवसेना निवडणूक लढविणार आहे आणि जिंकण्यासाठी सेना लढणार आहे हे निश्चीत आहे. त्यामुळे जिंकण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागणार आहेत त्या त्या सर्व गोष्टी केल्या जाणार आहेत. आपण स्वत: वारंवार गोव्यात येणार आहे, शिवाय खासदार संजय राऊत हे गोव्यासाठी  पूर्ण लक्ष्य देणार आहेत असे उद्धव यांनी सांगितले.गोवा सुरक्षा मंचाचे समन्वयक सुभाष वेलिंगकर यांच्या बरोबर ब-याच गोष्टींवर चर्चा झाली असल्याचे ते म्हणाले.  माध्यम विषयावर शिवसेना त्यांच्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले. मातृभाषेतून शिक्षण हा सेनेचाही आग्रह आहे. भाषा मंचाशी संलग्न असलेल्या गोवा सुरक्षा मंच या नव्यानेच निर्माण करण्यात आलेल्या पार्टीबरोबर युतीची अधिकृत घोषणा जरी झाली नसली तरी ती दिवाळीनंतर केली जाईल असे ते म्हणाले. तसेच शिवसेना किती जागा लढविणार आहे आणि कोणत्या मुद्यांवर निवडणूक लढविणार आहे या विषयी माहितीही देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. 
महाराष्ट्रात भाजप बरोबर युती करून गोव्यात भाजपविरोधात निवडणूक लढविणे म्हणजे विरोधाभास नव्हे का असे विचारले असता त्यांनी सरळ उत्तर देताना सांगितले की जिथे युती आहे तिथे भाजप त्यांचा  शत्रु नाही आणि जिथे युती नाही तिथे भाजप हा सेनेचा राजकीय शत्रु आहे असे आपण मानत असल्याचे ते म्हणाले. मात्र गोव्यात भाजपनेच सेनेपुढे युतीचा प्रस्ताव दिल्यास तो स्वीकारणार का या प्रश्नाला उत्तर देणे त्यांनी टाळले. भाजपकडून तसा प्रस्ताव येणे शक्य नाही असे त्यांनी सांगितले. बहुतेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी पुढच्या वेळी देतो असे सांगून टाळले. 
 
ये तो होनाही था- 
 
पाकिस्तानी कलाकारांच्या समावेशामुळे ‘ए दिल है मुष्कील’च्या  प्रदर्शनाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चित्रपट दिग्दर्शक आणि प्रदर्शनाला विरोध करणारे मनसेचे राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांच्य वर्षा निवासस्थानावर झालेल्या बैठकीविषयी उद्धव ठाकरे यांना पत्रकारांना विचारले तेव्हा त्यांनी फिल्मी स्टाईलमध्येच उत्तर दिले. ते तिघेही  नवीन चित्रपट काढत आहेत असे आपल्याला ऐकू आले होते.  चित्रपटाचे नाव आहे ‘ये तो होनाही था’ या मुद्यावर अधिक बोलणे त्यांनी टाळले. 
 
खंडणीचे पैसे लष्कराला नकोच: उद्धव
 
जबरजस्तीने पैसे गोळाकरून देण्यात आलेले पैसे हे खंडणीचे पैसेच ठरत आहेत. आपल्या देशाचे लष्कर स्वाभिमानी आहे. म्हणूनच असले खंडणीचे पैसे स्वीकारण्यास लष्कराने नकार दिल्याचे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी या संबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. 
करण जोहरचे पाकिस्तानी कलाकारांना घेऊन बनविलेले ये दिल है मुष्कील चित्रपटाला विरोध थांबवायला हवा असेल तर या चित्रपटातून मिळणाºया महसुलातील ५ कोटी रुपये लष्कर कल्याण निधीला दिला पाहिजे  अशी अट महाराष्ट्र निर्माण  सेनेचे नेते राज ठाकरे यांनी घातली होती. परंत अशा प्रकारे गोळा करून देण्यात आलेले पैसे लष्कराला नको असल्याचे लष्करानेच सांगून टाकल्यानंतर लष्कराच्या या भुमिकेला उद्धव ठाकरे यांनी समर्थन दिले. आपल्या लष्कराबद्दल देशाला गर्व असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Declaration of coalition alliance in Goa and after Diwali - Uddhav Thackeray