लिलाव न झालेला माल बार्जमध्ये भरल्याने गोंधळ
By Admin | Updated: May 29, 2014 07:18 IST2014-05-29T07:16:12+5:302014-05-29T07:18:10+5:30
पणजी : ज्या मालाचा खाण खात्याने लिलाव केलाच नव्हता, अशा प्रकारचा संमिश्र खनिज माल (आरओएम) सारमानस

लिलाव न झालेला माल बार्जमध्ये भरल्याने गोंधळ
पणजी : ज्या मालाचा खाण खात्याने लिलाव केलाच नव्हता, अशा प्रकारचा संमिश्र खनिज माल (आरओएम) सारमानस जेटीवरून रॉयल लाइन कंपनीने सहा बार्जमध्ये भरल्याचे उघड झाले आहे. ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी रमेश गावस यांनी या प्रकारास तीव्र आक्षेप घेतला आहे. गावस यांनी बुधवारी ‘लोकमत’ला सांगितले की, कुठला माल बार्जमध्ये भरला जातोय, यावर कुणाचीच देखरेख नाही. खाण खातेही देखरेख करत नाही आणि तज्ज्ञांचीही देखरेख समिती ते पाहत नाही. सारमानस जेटीवरून सहा बार्जमध्ये सुमारे दहा हजार टन माल भरला आहे. खाण खात्याची मान्यता नसताना हा माल भरला गेला. तो आता एमपीटीमध्ये उतरविणे शक्य नसल्याने त्या सहा बार्ज अरबी समुद्रात मध्येच राहिल्या आहेत. जीईएलच्या कर्मचार्यांच्या मदतीने रॉयल लाइन कंपनीने बार्जमध्ये माल भरला, असे गावस यांचे म्हणणे आहे. खाण खात्यातही या प्रकाराबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. रॉयल लाइन कंपनीने नजरचुकीने तो माल भरला, असा दावा काही अधिकारी करत असल्याचे कळते. खाण खात्याने खरा खनिज माल (फाइन) म्हणून जो माल दाखवला होता, त्याचाच लिलाव पुकारला गेला होता, की चुकून संमिश्र किंवा कच्च्या मालाचा (आरओएमचा) लिलाव पुकारला होता, असाही प्रश्न आता पुढे आला आहे. (खास प्रतिनिधी)