कावरेवासियांची पणजीत धडक
By Admin | Updated: May 14, 2014 07:16 IST2014-05-14T00:45:15+5:302014-05-14T07:16:16+5:30
पणजी : कावरे येथे बेकायदा खनिज मालाचीही वाहतूक केली जात आहे, असा आरोप करत कावरेतील लोकांनी मंगळवारी राजधानी पणजीत खाण खात्याच्या मुख्यालयावर धडक दिली.

कावरेवासियांची पणजीत धडक
पणजी : कावरे येथे बेकायदा खनिज मालाचीही वाहतूक केली जात आहे, असा आरोप करत कावरेतील लोकांनी मंगळवारी राजधानी पणजीत खाण खात्याच्या मुख्यालयावर धडक दिली. खाण खात्याचे संचालक प्रसन्न आचार्य व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचीही आंदोलकांनी भेट घेतली; पण सरकारकडून आपल्याला मोठासा दिलासा मिळाला नाही, उलट अपेक्षाभंग झाल्याचे काही आंदोलकांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी बुधवारी कावरेवासियांना बैठकीसाठी पणजीत बोलावले आहे. आम आदमी पक्षाचे राजेंद्र काकोडकर, स्वाती केरकर, तसेच ज्येष्ठ पर्यावरणवादी रमेश गावस यांच्यासोबत कावरेचे पंच सदस्य रवींद्र वेळीप व इतर ग्रामस्थांनी खाण संचालक आचार्य यांची भेट घेतली. बेकायदा खनिज वाहतूक बंद करावी, यासह अनेक मागण्या ग्रामस्थांनी संचालकांसमोर ठेवल्या. आमदार सुभाष फळदेसाई यांच्या भावाच्या मुलास दिलेले कावरेतील खनिज वाहतुकीचे कंत्राट रद्द करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर बेकायदा मालाची वाहतूक होणे शक्यच नाही, असे संचालक आचार्य यांनी ग्रामस्थांना सांगितले. जेवढ्या मालाचा लिलाव झाला आहे, तेवढ्याच मालाची वाहतूक केली जाईल. आम्ही कुणाचीच नियुक्ती वाहतूक कंत्राटदार म्हणून केलेली नाही. ज्या कंपनीने लिलाव जिंकून माल विकत घेतला आहे, त्या कंपनीने कुणाला कंत्राटदार म्हणून नेमले असेल, तर तो विषय आमच्या कार्यकक्षेत येत नाही, असे आचार्य म्हणाले. ई-लिलाव झालेल्या मालाची वाहतूक करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे जर तुम्ही पालन करत आहात, तर तिथे ट्रकांना आवश्यक उपकरणे का लावली गेलेली नाहीत, तिथे खाण खात्याचे अधिकारी का उपस्थित नाहीत, अशा प्रकारचे प्रश्न रमेश गावस व इतरांनी उपस्थित केले. लिजच जर सध्या अस्तित्वात नाही, तर तुम्ही जाहिरात देताना लिज क्रमांक कसा काय समाविष्ट करता, अशी विचारणा गावस यांनी केली. खाणींवर अगोदर काम करणार्या आमच्या लोकांची रोजगाराची संधी नष्ट झाली आहे. त्याकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी रवींद्र वेळीप व इतरांनी खाण संचालकांकडे केली. दरम्यान, सायंकाळी आंदोलकांनी मुख्यमंत्री पर्रीकर यांची भेट घेतली. पोलीस आमच्यावर अत्याचार करत असल्याची तक्रार आंदोलकांनी केली. पोलीस, खाण अधिकारी आदींची बुधवारी बैठक घेणार असून त्या वेळी तुम्हीही त्या बैठकीस या, असे मुख्यमंत्र्यांनी कावरेवासियांना सांगितले. कावरेत वाहतूक ही ई-लिलाव झालेल्या मालाचीच होत असून ती बंद करता येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी आम्हाला अटक केल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी आमची मागणी असल्याचे कावरेवासियांनी पत्रकारांना सांगितले. (खास प्रतिनिधी)